Thursday, 6 December 2018

दिनविशेष - ११ डिसेंबर २०१८


तिथी
मार्गशीर्ष शुक्ल ४ (२०:२२)
वार
मंगळवार
नक्षत्र
उत्तराषाढा (१३:२९)
योग
ध्रुव (२२:३९)
करण
वणिज (७:०४), विष्टि (२०:२२)


विनायक चतुर्थी-अंगारक योग

मंगळवारी चतुर्थी आल्यास त्यास अंगारकी चतुर्थी म्हणतात. मंगळवारच्या दिवशी चतुर्थी हा योग अत्यन्त शुभ आणि कार्यसिद्धि देणारा असतो. गणेश अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केल्याने वर्षभर चतुर्थी केल्याचे फल मिळते.

अंगारकी गणेश चतुर्थी कथा

गणेश चतुर्थी सोबत अंगारक हे नाव असणे मंगळाचे सानिध्य दर्शविते. पौराणिक कथेनुसार पृथ्वीचा पुत्र मंगळ देवाने भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी खूप कठोर तप केले. मंगळ देवाची तपस्या आणि भक्ति ने प्रसन्न होऊन भगवान गणेशाने त्याना दर्शन दिले आणि आपल्या बरोबर रहाण्याचा आशिर्वाद दिला. मंगळ देवाना तेज आणि रक्तवर्ण यामुळे अंगारक हे नाव मिळाले आहे. याचमुळे या चतुर्थीला अंगारक चतुर्थी म्हणतात.

कृच्छ्र्चतुर्थी

या व्रताचा आरंभ मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला होतो. हे व्रत प्रत्येक चतुर्थीला करावयाचे असून ते चार वर्षात पुर्ण होते. त्याचे विधान असे -
पहिल्या वर्षी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला प्रातःस्नान करुन व्रतनियम ग्रहण करावा आणि गणेशाचे यथाविधी पूजन करावे. नैवेद्य म्हणून लाडू, तिळाची वडी, जवाचा आणि तिखट-मिठाचा वडा हे पदार्थ घ्यावेत.

'त्वत्प्रसादेन देवेश व्रतं वर्षचतुष्टयं ।
निर्विघ्नेन तु मे यातु प्रमाणं मूषकध्वज ।'
संसारार्णवदुस्तरं सर्वविघ्नसमाकुलम् ।
तस्माद्दीनं जगन्नाथ त्राहि मां गणनायक ॥'
अशी प्रार्थना करून एक वेळ प्रमाणित भोजन करावे. त्याप्रमाणे प्रत्येक चतुर्थीस करावे. दुसर्‍या वर्षी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला पूर्वीप्रमाणे व्रतनियमग्रहण, व्रतपूजादी करून नक्त करावे. (एकदा रात्री जेवावे). अशाप्रकारे प्रत्येक चतुर्थीला, याप्रमाणे वर्षभर करावे. तिसर्‍या वर्षी पुन्हा मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला असे वर्षभर करावे. चौथ्या वर्षी याच मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला नियमग्रहण, व्रतसंकल्प आणि पूजादी करून निराहार उपवास करावा. याप्रमाणे दर चतुर्थीला असे एक वर्षपर्यंत करावे. चौथे वर्ष संपल्यानंतर पांढर्‍या कमळावर तांब्याचा कलश ठेवून सुवर्णाच्या गणेशमूर्तीची पूजा करावी. संवत्स धेनू दान करावी. हवन करावे. चोवीस ब्राह्मण दांपत्यांना भोजन घालून स्वतः जेवावे. ब्राह्मणांना वस्त्रे, भूषणे दान द्यावी. अशातर्‍हेने व्रत केले असता सर्वप्रकारची विघ्ने दूर होतात आणि सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते.

वरदचतुर्थी

कृच्छ्र चतुर्थीप्रमाणे हे व्रतही मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला सुरु होऊन चार वर्षांनी पूर्ण होते. पहिल्या वर्षी प्रत्येक चतुर्थीला दुपारी अळणी भोजन करावे. दुसर्‍या वर्षी नक्तभोजन करावे. तिसर्‍या वर्षी अयाचित भोजन करावे व चौथ्या वर्षी उपवास करून पूर्वीच्या व्रताप्रमाणे समाप्ती करावी. या व्रताने सर्वप्रकारची अर्थसिद्धी होते. अपरिमित भोजन याचा अर्थ काहीजण ३२ घास असा करतात, तर काहीजण २६ घास असा करतात.

'स्मृत्यंतर' मध्ये
'अष्टौ ग्रासा मुनेर्भक्ष्याः षोडशारण्यवासिनः ।
द्वात्रिंशतं गृहस्थास्यापरिमितं ब्रह्मचारिण: ॥'

मुनीने आठ घास, वनवासियांनी सोळा, गृहस्थांनी बत्तीस आणि ब्रह्मचार्‍यांनी यथारुची (अपरिमित) भोजन करावे, अशी शास्त्राची आज्ञा आहे. एक घास म्हणजे एका आवळ्याएवढे अन्न समजावे, किंवा जेवढे अन्न एकदा सहजपणे तोंडात घेता येईल, तो एक घास समजावा.
'याज्ञवल्क्यस्मृती' मध्ये, अगदी थोडे अन्न म्हणजे तीन घास समजावे, असे म्हटले आहे.

नक्त चतुर्थी  / नक्त चतुर्थी / मुकुंदा चतुर्थी

या मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला 'मुकुंदा चतुर्थी’ अशी संज्ञा आहे. या दिवशी श्रीगणेशाची पूजा करावी व या तिथीपासून प्रत्येक चतुर्थीला एक वर्ष एकवेळ खाऊन राहावे व दुसर्‍या वर्षी फक्त रात्रीचे जेवण करावे. तिसर्‍या वर्षी प्रत्येक चतुर्थीला न मागता मिळालेले अन्न एकवेळ खाऊन राहावे. चौथ्या वर्षी प्रत्येक चतुर्थीला निराहार राहून गणेशाचे चिंतन, भजन, असेच आवडीने पूजन करावे. अशा प्रकारे विधीपूर्वक चार वर्षे व्रत पूर्ण झाल्यानंतर शेवटी व्रतस्नान करावे. गणेशाची सुवर्ण प्रतिमा करावी. ते शक्य नसल्यास हळदीची करावी. नंतर विविध रंगांनी कमळाची पाने जमिनीवर काढून त्यावर कलश स्थापन करावा. कलशावर तांदळांनी भरलेले ताम्हन ठेवावे. तांदळांनी भरलेल्या ताम्हनावर वस्त्र ठेवून त्यावर गणेशाची स्थापना करावी. त्यानंतर गंधादी उपचारांनी दयामय ईश्‍वराची पूजा करावी. त्यानंतर लाडवांचा नैवेद्य दाखवावा. नमस्कार, प्रदक्षिणा व प्रार्थनेनंतर रात्रभर गायन-वादन, पुराण, कथा व गणेशाचे स्तवन व नामजाप करुन जागरण करावे.
सकाळ झाल्यावर स्नानादी नित्यकृत्ये उरकून, शुद्ध वस्त्र धारण करुन श्रद्धेने तीळ, तांदुळ, जव, पिवळी मोहरी, तूप व साखर या हवन-सामग्रीने होम करावा. गण, गणाधिप, कूष्माण्ड, त्रिपुरान्तक, लंबोदर, एकदंत, रुक्मदंष्ट्र, विघ्नप, ब्रह्मा, यम, वरुण, सोम, सूर्य, गंधमादी, तथा परमेष्ठी या सोळा नावांनी, प्रत्येक नावाच्या सुरुवातीस प्रणव आणि शेवटी चतुर्थी विभक्ती व नमः (उदा. गणाय नाम:| गणाधिपाय नाम: असे) हे पद जोडून अग्नीमध्ये एकएक आहुती द्यावी.
यानंतर
'वक्रतुंडाय नम:'
या मंत्राने १०८ आहुती द्याव्यात. त्यानंतर अग्निहोत्रीकडून यथाशक्ती होम करुन पुर्णाहुती द्यावी. नंतर दिक्पालांची पूजा करुन २४ ब्राह्मणांना अत्यंत आदराने लाडू आणि खिरीचे जेवण घालावे. आचार्यांना दक्षिणा व सवत्स धेनू दान करुन अन्य ब्राह्मणांना यथाशक्ती भूयसी दक्षिणा द्यावी. त्यानंतर त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना नमस्कार करुन प्रदक्षिणा घालावी व आदराने त्यांना निरोप द्यावा. मग आप्तेष्ट-मित्रांसह प्रसन्न चित्ताने स्वतः भोजन करावे. या व्रताचे पालन करणारी माणसे या लोकात उत्तम भोग भोगून गणेशाच्या प्रसादाने परलोकात विष्णूच्या सहवासात राहतात.
या चतुर्थीला 'नक्त चतुर्थी' असेही म्हणतात. व्रतकर्त्याने त्या दिवशी विनायकाची पूजा व नक्‍त भोजन आणि दुसर्‍या दिवशी तिलमिश्रित अन्नाने पारणे करावयाचे असते.

श्रवणिका व्रत

हे व्रत मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीस व अष्टमीस करतात. या तिथींना ब्राह्मण, कुमारिका यांना भोजन घालावयाचे असते. कुमारिकांच्यापुढे बारा जलपात्रे आलंकृत करुन ठेवावीत आणि एक जलपात्र स्वतःच्या मस्तकावर ठेवून केशवाचे ध्यान करावे, असे सांगितले आहे.

दग्ध योग

२०:२२ नंतर मंगळवारी पंचमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा

७:०४ नंतर २०:२२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका

योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

चतुर्थी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्थी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल ४ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment