Wednesday, 31 August 2016

दिनविशेष - १ सप्टेंबर – २०१६



तिथी
 श्रवण अमावस्या (१४:३०)  
वार
 गुरुवार
नक्षत्र
 मघा (१०:५३)
योग
 शिव (७:४४)
करण
 किंस्तुग्घ्न (२६:५९)


वृषभपूजन (पोळा)

वर्षभर शेतात कष्ट करून बळीराजाला(शेतकऱ्याला) शेतातून सोनं(धान्य) पिकवून देणाऱ्या बळीराजाच्या खऱ्या मित्राचा हा सण आहे.
वर्षभर उन,वारा आणि पावसात सतत कष्ट करणारे "बैल" यांच्यासाठी हा सोन्याचा दिवस.
सर्व शेतकरी बांधव अगदी देवाप्रमाणे आपल्या या मित्राला सजवून अगदी डौलात त्यांची मिरवणूक काढतात.
कारण बळीराजासाठी ते देवापेक्षा कमी नसतात.
मिरवणुकीनंतर मग त्यांना मानाचा"पुरणपोळी" चा नैवेद्य दाखवतात.

दर्भाहरण / कुशग्रहणी

हे व्रत श्रावण अमावस्येदिवशी सकाळी करतात. शास्त्रानुसार
'कुशा: काशा यव दूर्वा उशीराश्‍च सकुंदका: ।
गोधूमा ब्राह्मयो मौजा दशदर्भा सबल्बजा" ।'
असे दहा प्रकारचे कुश ( दर्भ ) सांगितले आहेत. यांतील जे मिळतील ते घ्यावेत. ज्या दर्भाचे मूळ तीक्ष्ण असेल, त्याला सात पाने असतील, शेंडा तोडला गेलेला नसेल व हिरवा असेल, तो देव व पितृ दोन्ही कार्यात चालतो. यासाठी दर्भ असलेल्या ठिकाणी जाऊन अमावस्येदिवशी पूर्व वा उत्तराभिमुख बसून
'विरंचिनासहोत्पन्न परमेष्ठिन्निसर्गज ।
नुद सर्वाणि पापानि दर्भ स्वस्तिकरो भव । हुं फट्'
हा मंत्र उच्चारून कुशदर्भाला उजव्या हाताने उपटावे व आणावेत. या दिवशी तोडून आणलेले दर्भ वर्षभर उपयोगात आणतात.

श्रावणी गुरुवार

दर गुरुवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Tuesday, 30 August 2016

पिठोरी अमावस्या कहाणी

पिठोरी म्हणजे श्रावण अमावस्या. या दिवशी महिला उपवास करतात. सायंकाळी स्न करून घरातल्या मुलाला किंवा मुलीला खीरपुरीचे जेवण देतात. या दिवशी ६४ योगिनींच्या चित्राची महिला पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतीत कोण?' असा प्रश्न विचारायचा असतो. त्याचे उत्तर म्हणून आपल्या मुलाचे नाव घ्यायचे. म्हणजे हा पुत्र किंवा कन्या दीर्घायुषी होतात, अशी श्रद्धा आहे.

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरीं श्रावणांतल्या अंवसेच्या दिवशीं बापांचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशीं श्राद्ध त्या दिवशीं सकाळपासून त्याच्या सुनेचें पोट दुखूं लागें व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं. म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्षं झालं. सातव्या वर्षीहि तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. तें मेललं पोर तिच्या ओटींत घातलं. तिला रानांत हांकून लावलं. पुढं जातां जातां ती एका मोठ्या अरण्यांत गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तूं कोणाची कोण ? इथं येण्याचं कारण काय ? आलीस तशी लौकर जा. नाहीं तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील !

तेव्हां ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करतांच मी इथं आल्यें आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तूं इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अंवसेच्या दिवशीं बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशीं आमच्या घरीं माझ्या आजेसास-याचे श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझीं झालीं. सातव्या खेपेलाहि असंच झालं. तेव्हा मामंजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला, तर तूं घरांतून चालती हो ! असं म्हणून हें मेलेलं मूल माझ्या ओटींत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता जगून तरी काय करायचं आहे ? असं म्हणून रडूं लागली.


तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तूं भिऊं नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून रहा. रात्री नागकन्या, देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथि कोण आहे म्हणून विचारतील. असं झाल्यावर मीं आहे म्हणून म्हण. त्या तुला पहातील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हां तूं सगळी हकीकत त्यांना सांग ! ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तों एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहूं लागली. तों जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यांत रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आस-यांच्या स्वा-यासुद्धां आल्या. त्यांनीं शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथि कोण आहे ? म्हणून विचारलं.

त्याबरोबर ती खालीं उतरली मीं आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनीं मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनीं तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हां आसरांनीं ती दाखवली. पुढं त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हें व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकीं हें व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिनं विचारलं, ह्यानं काय होतं ? आसरांनी सांगितलं. हें व्रत केलं म्हणजे मुलबाळं दगावत नाहीत, सुखासमाधानांत राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली.


ती आपल्या गांवांत आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं. भटजी भटजी, तुमची सून घरीं येते आहे. त्याला तें खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तों मुलबाळं दृष्टीस पडूं लागली. पाठीमागून सूनेला पाहिलं. तसा उठला, घरांत गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळांसुद्धां सुखानं ती नांदू लागली. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

दिनविशेष - ३१ ऑगस्ट - २०१६



तिथी
 श्रवण कृष्ण १४ (१४:०४)  
वार
 बुधवार
नक्षत्र
 आश्लेषा (९:४९)
योग
 परिघ (८:२९)
करण
 चतुष्पाद (२६:१५)


पिठोरी अमावस्या

एक काम्य व्रत. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे -
श्रावण अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्‍वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्‍या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन 'कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी 'मी आहे' असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे.

दर्शश्राद्ध

दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.

मातृदिन

भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला  रात्री ६४ योगिनी यांची पूजा केली जाते, ही पूजा ज्यांची मुले जगत नाहीत अशा स्त्रियांनी करावयाची आहे, त्या पूजेमुळे मुले जगतात असे फळ सांगितले असल्याने त्या योगिनी मातृवत होतात म्हणून त्या दिवसाला मातृदिन असे रूढार्थाने म्हटले असावे.
आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेच स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे.
ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय मानले गेले आहे.
अथर्ववेदामध्ये 'मात्रा भवतु सम्मना:' पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे.
प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत. त्यात "मातृदेवो भव" मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत. वसिष्ठाने मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना पुढीलप्रमाणे म्हटले आहे -
"दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे."

धर्मसूत्रांनी मातेची सेवा-शुश्रूषा आणि तिचे भरणपोषण हे पुत्राचे आवश्यक कर्तव्य म्हणून सांगितलेले आहे. गौतम ऋषींचा पुत्र चिरकारी याने मातृमहात्म्याचे सुंदर चित्र इंद्रापुढे उभे केले होते.

नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:|
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया||

मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.

चिरकारी पुढे म्हणतो - "ती मुलांना जन्म देते म्हणून जननी. त्यांच्या अंगप्रत्यंगांना पुष्टी देते म्हणून अंबा आणि वीर संतती उत्पन्न करते म्हणून विरप्रसू म्हटले जाते. माता हे सर्व पीडितांचे सुख आहे. ती असते म्हणून लोक सनाथ असतात आणि ती गेल्याने अनाथ होतात.

सतीपूजन

याच दिवशी सतीचे पूजनही करतात. सर्व सौभाग्यवायने, आभूषणे एकत्र करून त्याला सात प्रदक्षिणा करतात. यात घरच्या मुलींनी भाग घ्यायचा नसतो.



श्रावणी बुधवार

दर बुधवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Monday, 29 August 2016

दिनविशेष - ३० ऑगस्ट - २०१६



तिथी
 श्रवण कृष्ण १३ (१४:०३)  
वार
 मंगळवार
नक्षत्र
 पुष्य (९:१३)
योग
 वरीयान (९:३५)
करण
 विष्टि (२६:००)

श्रावणी मंगळवार

दर मंगळवारी मंगळागौरी पूजन करावे.
सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी ह्या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन करतात.

सुवासिनी स्त्री श्रावणातल्या मंगळवारी आपल्या विवाहित मैत्रिणींसह शिवासमवेत असलेल्या गौरीची पूजा करते. पहिल्या वर्षी माहेरी मातृगृही हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे व्रत विशेषतः महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्री वर्गात विशेषतः आचरले जाते. बरोबरीच्या विवाहित मैत्रिणी (यांना वसोळ्याम्हणतात) एकत्र जमून मंगळागौर रात्रभर जागवितात. निरनिराळे खेळ, गाणी, उखाणे इत्यादींनी मजेत दिवस व रात्र घालवितात व दुसरे दिवशी पहाटे पूजा-आरती करून सांगता करतात. हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांकरिता आहे. जय जय मंगळगौरीम्हणून

सोळा वातींची मंगल आरती भक्तिभावाने सुवासिनी स्त्रिया करतात आणि नंतर हातात तांदूळ घेऊन बसतात व मंगळागौरीची कहाणी ऐकतात. ती कहाणी तात्पर्याने अशी : सुशीला नावाच्या एका साध्वीस मंगळागौरी प्रसन्न झाली व पुढे तिला वैधव्य प्राप्त झाले असताना मंगळागौरीने यमदूतांशी युद्ध करून तिच्या पतीचे प्राण परत आणले आणि तिला अखंड सौभाग्यवती केले. मंगळागौरीच्या भक्तिपूर्वक केलेल्या पूजेचे हे फल होय. ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनी हातातील तांदूळ देवीला वाहतात. दुपारी मौन आचरून भोजन करतात.
मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.पाच अथवा सात व्रते केल्यावर उद्यापन करतात.


शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

रविचा पूर्वाफाल्गुनी नक्षत्री प्रवेश

१४:४० ला रवि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करीत आहे.
रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रवि चे नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी
चंद्र नक्षत्र: आश्लेषा

वाहन गाढव

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
वाहन
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
घोडा
पर्वतावर पाऊस पडेल
कोल्हा
पाऊस पडणार नाही.
बेडूक
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
मेंढा
पाऊस पडणार नाही.
मोर
अल्पवृष्टी होईल.
उंदीर
अल्पवृष्टी होईल.
महिष
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
गाढव
अल्पवृष्टी होईल.
० / ९
हत्ती
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
रवि चे नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 
चंद्र नक्षत्र: आश्लेषा
अंतर : २६
२६ ला ९ ने भागले असता बाकी राहते ८. म्हणून वाहन गाढव आहे. याचाच अर्थ रवि पुर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना अल्पवृष्टी होईल.

नक्षत्रसंज्ञा : सूर्य-चंद्र

सूर्य नक्षत्रे
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्रे
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती

दोन्ही सूर्य नक्षत्रे
 वारा सुटेल
दोन्ही चंद्र नक्षत्रे
 पाऊस पडणार नाही
एक चंद्र व दुसरे सूर्य
 पाऊस पडेल
रवि चे नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी = सूर्य नक्षत्र 
चंद्र नक्षत्र: आश्लेषा = चंद्र
एक चंद्र व दुसरे सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि पुर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना चांगला पाऊस पडेल.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री, स्त्री

स्त्री नक्षत्रे
 आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
पुरुष नक्षत्रे
 अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
नपुंसक नक्षत्रे
 विशखा, अनुराधा, जेष्ठा

सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.

रवि चे नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र: आश्लेषा = स्त्री नक्षत्र
दोन्ही  स्त्री नक्षत्र आहेत. त्यामुळे रवि पुर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना अल्प वृष्टी होईल.

पावसाचा अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.

भद्रा

१४:०३ नंतर २६:०० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष माणू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट