Friday, 5 August 2016

दिनविशेष - ६ ऑगस्ट - २०१६



तिथी
 श्रवण शुक्ल ४ (२८:०५)  
वार
 शनिवार
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (अहोरात्र)
योग
 शिव (२२:४८)
करण
 वणिज (१५:१९)

विनायक चतुर्थी

विनायकी हे संकष्टीप्रमाणेच एक सर्व कामनांना सिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' असे म्हणतात. आपल्या पंचागात विनायकी व संकष्टी असे उल्लेख असतात. संकष्टीप्रमाणेच विनायकी हे व्रत आहे व ते गजाननाला प्रिय आहे. त्याचा पूजाविधी संकष्टीप्रमाणेच असतो. विनायक हे गणपतीचेच नाव आहे. या दिवशी चंद्रदर्शन अथवा चंद्रपूजा याचा संबंध नसतो. या दिवशी दोन वेळा उपवास करावयाचा असतो. दुसरे दिवशी पारणे करतात. या व्रतसाधनाने सर्व विघ्ने, बाधा वगैरेचे निरसन होते व सर्व कामना परिपूर्ण होतात. गणपतीची कृपा होते. महान सिद्धिदायक असे हे व्रत आहे. संकटकाळी पुष्कळ लोक आपल्या संकटनाशनार्थ हे व्रत करतात व श्रीगजाननाला नवस बोलतात. या विनायकी ७, ११, २१, अशा ठरवून करावयाच्या असतात.

नागचतुर्थी (उपवास)

उपवासाचे महत्त्व

पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. `भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्‍ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.

नागाची पूजा करणे

सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

नवीन वस्त्रे व अलंकार घालणे

सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.

मेहंदी लावणे

सत्येश्‍वर नागराजाच्या रूपात सत्यश्‍वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. `तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्‍वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वत:च्या हातांवर मेहंदी काढते.

झोका खेळणे

दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो – `जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दु:खे खाली जाऊ देत.

दुर्वागणपती व्रत

सौर पुराणा नुसार हे व्रत तीन किंवा पाच वर्षे करावे.
हे व्रत श्रावण शुक्ल चतुर्थीला करतात. ही चतुर्थी मध्याह् नव्यापिनी धरतात. जर ती दोन्ही दिवशी असेल तर अगर दोन्हीही दिवशी नसेल तर 'मातृविद्धा प्रशस्यते' या नियमाने पूर्वविद्धा धरावी. त्या दिवशी प्रात: स्नानादी कर्मे करून एकदंत, चतुर्भुज, गजानन, सुवर्णाच्या आसनावर बसलेली अशी श्रीगणेशाची मूर्ती करावी. दुर्वाही सोन्याची करावी. नंतर सर्वतोभद्र आसनावर मंडलावर कलश स्थापन करावा. त्यावर दूर्वा ठेवून गजाननाची स्थापना करावी. त्यास लाल वस्त्र वाहावे व अनेक प्रकारच्या सुगंधित पत्री, फुले, बेलपान, आघाडा, शमी, दूर्वा आणि तुळशीपत्र अर्पण करून पूजा करावी. नंतर आरती करून
'गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन ।
व्रतं संपूर्णतां यातु त्वत्प्रसादादिभानन ॥
अशी प्रार्थना करावी. याप्रमाणे ३ अगर ५ वर्षे केल्याने सर्व अभीष्टे सिद्ध होतात.

श्रावणी शनिवार

दर शनिवारी नरसिंह-पिंपळ शनी-मारुति पूजन करावे.

भद्रा

१५:१९ नंतर २८:०५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment