Saturday, 20 August 2016

दिनविशेष - २१ ऑगस्ट - २०१६




तिथी
 श्रवण कृष्ण ३ (८:१८), श्रवण कृष्ण ४ (२९:४४)  
वार
 रविवार
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (१८:४६)
योग
 धृति (११:१४)
करण
 बव (१९:०१)

कज्जली तृतीया

हे व्रत श्रावण कृष्ण तृतीयेला करतात. कधी कधी देशकाल-परिस्थितीभेदाने हे व्रत भाद्रपद कृष्ण तृतीयेला करतात. परंतु खरे हे व्रत श्रावण कृष्ण तृतीये दिवशी करावयाचे असते. माहेश्‍वरी वैश्य लोक या दिवशी जवस, गहू, हरबरे आणि तांदळाच्या पिठांत तूप, गोड पदार्थ घालून त्यापासून अनेक प्रकारची पक्वान्ने करतात आणि चंद्रोदयानंतर त्याचेच एकवेळ भोजन करतात. यामुळे या व्रताला 'सातूडी तीज' सातवी तीज' असेही म्हणतात.

बूढी तीज

उत्तर भारतात या व्रताचा प्रचार फार आहे. या दिवशी वृद्ध स्त्रिया झोपाळ्यावर बसून गाणी गातात. त्याला 'कजरी' असे म्हणतात. सात गाईंना या दिवशी कणिकेची रोटी खाऊ घालून त्या एकवेळ जेवतात. सासूला अगर वृद्ध स्त्रीला नमस्कार करून बताशांचे वाण देतात व उलट मेवामिठाई त्यांना मिळते.

विशालाक्षी यात्रा

हे व्रत श्रावण कृष्ण तृतीये दिवशी करतात. यासाठी रात्रिव्यापिनी तिथी घेतात. या दिवशी उपवास व जागरण करतात. सुवर्णाची गौरीची मूर्ती करून तिची यथाविधी पूजा करतात. नैवेद्यात गुळाचा सांजा असतो. विशालाक्षी यात्रा मुख्य आहे.

संकष्टी चतुर्थी

पुणे चंद्रोदय: २१:१७
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः '
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.


गोत्रव्रत

श्रावण कृष्ण चतुर्थीला स्त्रिया हे व्रत करतात. या चतुर्थीला 'बेल चौथ' असेही म्हणतात. व्रताचा विधी असा - एकवर्णी सवत्स धेनूची पूजा. 'तुझे सत्य माझी भक्‍ती' असे वाक्य गाईच्या कानात उच्चारणे. कथाश्रवण व नंतर भोजन. या दिवशी गोरसाचा कोणताही पदार्थ खात नाहीत. त्याचप्रमाणे सुरीने किंवा कात्रीने कापलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत.
फल - पुत्रप्राप्ती व सौभाग्यवृद्धी.

श्रावणी रविवार

दर रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे.

घबाड

१८:४६ नंतर २९:४४ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मघा
चंद्र नक्षत्र : रेवती
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा

८:१८ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment