शुक्रवाराची कहाणी- १
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्यानं फार पिडला
होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं
गाईलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, “बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर.
हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं.
तिचे पाय धुवावे. तिला हळद-कुकूं द्यावं. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला
द्यावं. भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणं वर्षभर
करून नंतर त्याचं उद्यापन करावं” असं सांगितलं. ती घरी आली. देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू
लागली.
त्याच गावांत तिचा भाऊ रहात असे. तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला.
साऱ्या गावाला आमंत्रण केलं पण बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक
हसतील. पुढं दुसरे दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे मारे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर
जेवीत आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल. तर आपल्याला
भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असा मनांत विचार केला. सोवळे नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका
पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं
झालं. तेव्हां तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां तिच्या पानाशीं
आला. ती खालीं मान घालून बसली होतीं. तिला हाक मारली, “ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे
लोक मला हसतात, ह्यामुळं मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या
काही येऊ नको”. असं सांगून पुढं गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना
घेऊन घरी आली.
दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, “आई आई, मामाकडं जेवायला चल.” बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरीबी आहे. तर आपल्याला ऐकून
घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडाला, तितकाच फायदा झाला, असं म्हणून त्याही
दिवशी भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढतां वाढतां तिच्या पानाशी आला. ती खाली
मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, “ताई ताई, भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं
ऐकत नाही. तू जेवायला येऊं नको म्हणून काल सांगितलं, आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन
आलीस. तुला लाज कशी नाही वाटली? आज आलीस तर आलीस. उद्या आलीस तर तुला हात धरून घालवून देईन”. तिने ते मुकाट्यानं
ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं
पाहिलं, हात धरून घालवून दिलं. फार दुःखी झाली, देवीची प्रार्थना केली. सारा दिवस
उपास पडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली.
असं करता करता वर्ष झालं. बाईचं दळिद्र गेले. पुढं एक दिवशी ती शुक्रवारचं
उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनात ओशाळा झाला. बहिणीला म्हणूं
लागला, “ताई ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही काही म्हणू नको. घरी काही जेवू नको.
उद्या तू आलीस नाही तर मी काही तुझ्या घरी येणार नाही”. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या
मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लौकर उठली, वेणीफणी केली. दागदागिने ल्याली, उंची पैठणी नेसली, शालजोडी घेतली आणि
भावाकडे जेवायला गेली. भाऊ वाट पहातच होता. ताई आली तसा तिचा हात धरला, पाटावर बसवली, पाय धुवायला ऊन पाणी
दिलं. पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या
शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्यापाटी ठेवली. भाऊ
पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली.
बसल्यापाटी ठेवू लागली. भावानं विचार केला, जड झाले म्हणून काढीत असेल, नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला, तो उचलून सरीवर ठेवला, भाजी उचलून ठुशीवर
ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्यांच्या पेंद्यावर ठेवली.
भावानं विचारलं, “ताई ताई, हे काय करतेस?” ती म्हणाली, “दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिला भरवते आहे.” भाऊ काही हे समजेना.
त्यानं तिला पुन्हां सांगितलं, “अग ताई, तू आता जेव तरी”. तिनं सांगितलं, “बाबा, हे माझे जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले”. इतकं ऐकल्यावर भाऊ
मनांत ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली.
बहिणीनं क्षमा केली. नंतर दोघजणं जेवली. मनातली अढी काढून टाकली. दोघांनी देवीचे
आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला.
देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हा आम्हा करो, ही साठां उत्तरांची
कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
शुक्रवाराची जिवतीची कहाणी - २
ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां
राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन”. सुईणीनं गोष्ट कबूल
केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली.
तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली, तिला सांगू लागली की, “बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन”. तिनं होय म्हणून
सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब, बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला
नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसताहेत. तेव्हा आपल्या
घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं.
आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन”. असं ऐकल्यावर राणीला
मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याच डंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर
लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी
केली.
इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावू आलं त्याबरोबर “तुम्ही पुढ व्हा, मी येते,” म्हणून सांगितलं. धावत
धावत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करू सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप.
डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून
भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा
बांधला आणि तिच्यापुढे ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू
लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली.
राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं.
इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी
आणि नमस्कार करून म्हणावं की, “जय जिवतीआई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो”, असं म्हणून तिनं
तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून
जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागू
लागली.
इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही
न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तीजवर गेली. हा
मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला.
दारात गाय-वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला.
वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर
पाय दिला”? तेव्हा ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी
येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली.
काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला
पुष्कळ मुलं होत होती. पण ती पाचवी-सहावीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी
चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि
म्हणू लागली, “कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे”? जिवती उत्तर करिते, “अग अग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही”. मुलगा आज जाणार म्हणून
त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर
रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या. उजाडाल्यावर
ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणं प्रकार झाला.
दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत
गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर
आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, “घरी जा. साऱ्या
गावातल्या बायकापुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचे कारण समजेल.” मनाला मोठी चुटपुट
लागली. घरी आला. मोठ्या थाटानं मामदं केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद
दिली. “घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला
निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं.
जिथं तांदुळाचं धूण होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या
भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवांखालून गेली नाही. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल
तिथं खुशाल असो” असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता
वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला.
बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या
ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना.
तेव्हां त्याची आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं की, “ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत
सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक
मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला.
तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ
संपूर्ण.
No comments:
Post a Comment