Tuesday, 16 August 2016

दिनविशेष - १७ ऑगस्ट - २०१६



तिथी
 श्रवण शुक्ल १४ (१६:२७)  
वार
 बुधवार
नक्षत्र
 श्रवण (२४:१७)
योग
 सौभाग्य (२२:२१)
करण
 विष्टि (२७:४६)

नारळी पोर्णिमा

समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. यादिवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात.

श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्‍यालगत राहणार्‍या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

कुलधर्म

जुने जानवे टाकुन नवीन जानवे घालणे, पुन्हा नव्याने अध्यनन करणे, हा श्रावणातल्या श्रवण नक्षत्रावर करावयाचा सांघिक स्वरुपाचा कुलाचार आहे. त्यावेळी वेगवेगळ्या देवतांचे पुजन होम - हवन विधी करतात.

ऋक् श्रावणी (उत्सर्जन व उपाकर्म)

-    जुने जानवे टाकुन नवीन जानवे घालणे, पुन्हा नव्याने अध्यन करणे, हा सांघिक स्वरुपाचा कुलाचार आहे.
-    त्यावेळी वेगवेगळ्या देवतांचे पुजन होम - हवन विधी करतात.
१)      ॠग्वेदीयांना श्रावण शुक्ल पक्षात श्रवण नक्षत्र हा मुख्य काल सांगितला आहे. तो साधेल तर पंचमी अथवा हस्त नक्षत्र घ्यावे.
ऋग्वेदीयांनी पूर्वाण्हात श्रावणी करावी.
२)      यजुर्वेदीयांना श्रावणी करिता श्रावणातील पौर्णिमा हा मुख्य काळ सांगितला आहे
जेव्हा दोन दिवस सूर्योदयव्यापी पौर्णिमा असेल तेव्हा पूर्व दिवसाची घ्यावी.
३)      तैत्तरीय शाखीयांनी दुसऱ्या दिवशी ४-६ घटिकांहून अधिक आणि १२ घटिकांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या दिवशीची घ्यावी.
४)      हिरण्यकेशी तैत्तारीयांनी श्रावण पौर्णिमा हा मुख्य काळ घ्यावा. तो न साधेल तर संगवकाळाला स्पर्श करणारे श्रावणातील हस्त नक्षत्र घ्यावे.
५)      आपस्तंबांच्या श्रावणीला श्रावणातील पौर्णिमा हा मुख्य काळ सांगितला आहे. ती न मिळेल तर भाद्रपदातील पौर्णिमा घ्यावी.
६)      बौधायनांना श्रावणातील पौर्णिमा हा मुख्य काळ आहे. ती न मिळेल तर आषाढातील पौर्णिमा घ्यावी.
७)      कात्यायन, काण्व-माध्यंदिन यांना श्रावण महिन्यातील श्रवणयुक्त पौर्णिमा, किंवा श्रावणातील केवळ पौर्णिमा किंवा हस्तयुक्त पंचमी किंवा केवळ पंचमी हे मुख्य काळ आहेत. श्रावणातील पौर्णिमा किंवा पंचमी न साधल्यास भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा किंवा पंचमी घ्यावी.
८)      सामवेदीयांना भाद्रपद शुक्ल पक्षातील हस्त नक्षत्र हा प्रमुख काळ आहे. संक्रांति## इ. दोषांमुळे तो न मिळाल्यास श्रावणातील हस्त नक्षत्र घ्यावे.
सामवेदीयांना उपाकर्माला अपराण्हकाल हा मुख्य काल सांगितला आहे.
९)      अथर्ववेदीयांना श्रावणी पौर्णिमा किंवा भाद्रपद पौर्णिमा हा प्रमुख काळ आहे. यासाठी सूर्योदयापासून सांगवकाळापर्यंत तिथी घ्यावी.

##सर्वच शाखांसाठी श्रावणीसाठी ग्रहणकाळ संक्रतीकाळ वर्ज आहेत.
-    श्रावण अधिक असेल तर कोणाचीच श्रावणी करू नये.

-    नवीन मौंजी झालेल्यांनी नवी श्रावणी (प्रथम उपाकर्म) करण्यासाठी वरीलपैकी जो योग्य आहे तो दिवस घ्यावा. मात्र त्यामध्ये गुरु-शुक्रांचे अस्त, सिंहस्थ गुरु, तिथी क्षय, भद्रा वर्ज करावे.

श्रवणाकर्म/ श्रवणपूजन

श्रावण पौर्णिमेदिवशीच राजा दशरथाच्या हातून वन्यपशू समजून नेत्रहीन मातापित्यांचा एकुलत एक पुत्र श्रावण मारला गेला. त्यावेळी राजा दशरथाने त्यांचे सांत्वन केले व आपल्या हातून चुकीने झालेल्या हत्येचे परिमार्जन व्हावे म्हणून श्रावणी पौर्णिमे दिवशी 'श्रवणपूजे' चा सर्वत्र प्रसार केला. तेव्हापासून बहुतेक सर्व श्रद्धाळू जन त्या दिवशी 'श्रवणपूजा' करून त्यालाच रक्षा अर्पण करतात. (हे व्रत नाही.)

श्रावणी बुधवार

दर बुधवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.


पतेति

पारशी कालगणनेनुसार सन १३८६ सुरु होत आहे.
पतेती हा पारशी मंडळींचा नववर्ष दिन असतो.

पतितांना पावन करते ती पतेती.
पारशी हे झरतुष्ट्राचे अनुयायी. त्यांचं वर्ष तीनशेसाठ दिवसांचं असतं. उरलेले पाच दिवस (गाथा) फक्त देवाचे असतात. या पाच दिवसांत अनेक प्रकारची व्रते करतात. या पाच दिवसांतल्या शेवटच्या दिवसाचं नाव "पतेती".
पारशी लोक अग्नी पुजक आहेत. "अहुरमझदा" म्हणजे ईश्वराचं प्रतिक म्हणून ते अग्नीची पूजा करतात. या दिवशी सकाळी लवकर उठून अग्यारीत (पारशी प्रार्थना मंदिर ) जातात. तेथे अग्नीला चंदनाच्या समिधांनी आहुती देतात.  घराची सजावट करतात. पांढरा शुभ्र कोट व पार्शी टोपी असा परंपरागत वेष घालतात.  मस्त गोड मेजवानी करतात.
पतेतीचा मुख्य उद्देश.म्हणजे पश्चात्ताप व्यक्त करण्याची प्रार्थना करणे.
जमशेद नावाच्या बादशहाने या सणाला सुरुवात केली. .म्हणून त्याचं नाव या सणाशी जोडून .पतेती नवरोजला जमशेदजी नवरोज असेही म्हणतात. 

प्रार्थना आणि सण दोन्ही एकत्र जोडून साजरा करण्याची पारशांची पध्दत मोठी मनोज्ञ आहे


भद्रा

१६:२७ नंतर २७:४६ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment