Saturday, 26 September 2015

दिनविशेष - २८ सप्टेंबर २०१५

तिथी
 भाद्रपद पौर्णिमा (०८:२१), भाद्रपद कृ.  १ (२८:३५)
वार
 सोमवार
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (१७:५५)
योग
 वृद्धी (१६:२७)
करण
 बालव (१८:२७)

इंद्रपौर्णिमासी

भाद्रपद पौर्णिमेस हे व्रत करतात. या दिवशी उपवास, तीस दंपतींना भोजन व वस्त्रालंकार देणे, हा या व्रताचा विधी आहे.
फल - मोक्ष.

शिवपार्वती-पूजन

भाद्रपद पौर्णिमेला ही पूजा करतात. सकाळी स्नान झाल्यावर शिवपार्वतीच्या मूर्तीची पूजा करावी. रात्री गुणगान, कीर्तन करावे, जागरण करावे. ब्राह्मणभोजन व दक्षिणा द्यावी.

भागवत साप्ताह समाप्ती

२२ तारखेला सुरु झालेल्या भागवत साप्ताहीची समाप्ती होत आहे.

संन्यासिनां चातुर्मास्य समाप्ति

या दिवशी संन्यासव्रत घेतलेल्यांचा चातुर्मास समाप्त होत आहे. व्यासपूजनाच्या दिवशी याची सुरवात झाली होती.

ग्रस्तास्त चंद्रग्रहण

ग्रहण स्पर्श: सकाळी ६:३७
ग्रहण मध्य: सकाळी ८:१७
ग्रहण मोक्ष: सकाळी ९:५८
हे ग्रहण खग्रास असले तरी भारतामधील फक्त पश्चिमेकडील गुजरात व राजस्थान मधील काही प्रदेशात खंडग्रास दिसणार आहे. हे ग्रहण ग्रस्तास्त असल्यामुळे ग्रहण ग्रस्त झालेले चंद्रबिंब अस्तास जाईल. ग्रहण मध्य व ग्रहण मोक्ष अवस्था दिसणार नाही.

ग्रहण दिसणारे प्रदेश

भारत मध्य आशिया खंड, आफ्रिका खंड, दक्षिण व उत्तर अमेरिका

पुण्यकाल

ग्रहण स्पर्शापासून चंद्रास्त (सूर्योदय) होईपर्यंतचा काळ पुण्यकाल आहे.

वेधारंभ

हे ग्रहण रात्रीच्या चौथ्या प्रहरात लागते. म्हणून २७ सप्टेंबर रोजी रविवारच्या सुर्यास्तापासून ग्रहणाचे वेध पाळावेत. वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, जपजाप्य, श्राद्ध हि कर्मे करता येतील. बाल, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी रविवारी रात्री ९ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.

महालयारंभ

मनुष्यमात्रावर देव-ऋण, ऋषि-ऋण आणि पितृ-ऋण अशी तीन ऋणे असतात, असे शास्त्रात सांगितले आहे. यांपैकी पितृऋण आपण श्राद्ध करून फेडीत असतो. कारण ज्या मातापित्यांनी आयुरारोग्याच्या आणि सुखसौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्या ऋणामधून अल्पांशाने तरी मुक्त होण्याचा आपण प्रयत्‍न नाही केला, तर आपण जन्माला येऊन व्यर्थ होय. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मृत्युतिथीला सर्वांस सहज प्राप्त होणार्‍या जल, तीळ, तांदूळ, कुश (दर्भ) आणि पुष्प एवढ्या साधनांनी त्यांचे श्राद्ध घालावयाचे, गोग्रास वाढावयाचा आणि यथाशक्ती एक तीन, पाच ब्राह्मणांना भोजन घालावयाचे, एवढे केल्याने आपल्या वरचा पितृऋणभार हलका होतो. म्हणून अशा सहजसाध्य होणार्‍या गोष्टीची आपण उपेक्षा करू नये. यासाठी ज्या महिन्याच्या त्या तिथीस आपल्या मातापितरांचा मृत्यू झाला असेल, त्या महिन्याच्या त्या तिथीस श्राद्धदी कर्म करणे, शिवाय भाद्रपद व. पक्षात (महालय पक्षात ) सुद्ध त्याच तिथीला श्राद्ध, तर्पण, गोग्रास आणि ब्राह्मणभोजनादी करणे अथवा करविणे आवश्यक आहे. हे श्राद्ध, पितृत्रयी - पिता, पितामह, प्रपितामह; मातृत्रयी - माता, पितामही, प्रपितामही, सापत्‍नमाता, मातामह, मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही, मातृपितामही, मातृपतिपामही, पत्‍नी, पुत्र, कन्या, पितृव्य, मातुल, बंधू, आत्या, मावशी, बहीण, पितृव्य - पुत्र, जावई, बहिणीचा मुलगा, सासरा, सासू, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते. असे केल्याने मातापितरांच्या मृत्युतिथीला मध्यान्हसमयी मुलाने पुन्हा स्नान करून श्राद्धादी कर्म करावे आणि ब्राह्मणभोजन घालून स्वत: भोजन करावे. ज्या स्त्रिला पुत्र नाही, तिने आपल्या पतीचे श्राद्ध त्या तिथीला स्वत: केले तरी चालते. भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत सोळा दिवस पितृतर्पण आणि तिथीच्या दिवशी श्राद्ध अवश्‍य करावे. याप्रमाणे केल्याने 'पितृव्रत' यथासांग पूर्ण होते.
या पक्षात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीय माणसांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे
'यावद् वृश्‍चिकदर्शनम्
म्हणजे सूर्य वृश्‍चिकराशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला केला तरी चालतो. महालयासाठी आप्तेष्टांनाही भोजनाचे निमंत्रण द्यावे.

आरोग्यव्रत

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून आश्‍विन पौर्णिमेपर्यंत प्रतिदिनी कमलांनी अनिरुद्धमुर्तिची पूजा करावी. उद्यापनाच्या आधी तीन दिवस उपवास, होम करावा व ब्राह्मणभोजन घालावे.
फल - आरोग्य व सौंदर्य यांचा लाभ.

गजगौरी व्रत (हादगा-भोंडला)

नवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

क्षयदिन

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.

क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment