तिथी
|
भाद्रपद शु ७ (२६:२३)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (०७:०४)
|
योग
|
आयुष्यमान (१७:५६)
|
करण
|
विष्टी (१४:२९)
|
दुर्गाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
गौरीविसर्जन
सकाळी ०७:०४ नंतर मूळ नक्षत्रावर गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना
नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
दोरे घेणे / दोरकग्रहण
ज्येष्ठा
गौरीच्या पूजेच्या वेळी दोरक ठेवून विसर्जनानंतर तो दोरक घेतला जातो. दोरक
घेण्याच्या विधीस ‘दोरकग्रहण’ असे म्हणतात.
दोरक म्हणजे हाताने काढलेल्या सुताचे सोळा पदरी हळदीत भिजवून रंगवलेले सूत्र होय.
सोळा ही संख्या लक्ष्मीशी निगडित असल्यामुळे दोरकातही सोळा पदर असतात.
हा दोरक अत्यंत
शुभकारक आणि लक्ष्मीप्राप्ती करून देणारा असतो. घरातील सर्व स्त्रिया दोरक धारण
करतात. काही प्रांतांत पुरुषही आपल्या हातात हा दोरक धारण करतात. काही जण हा दोरक
आपल्या धनकोशात, धान्यकोठारात, वास्तूच्या पायात
आणि देवघरात ठेवतात.
गुर्वष्टमीव्रत
भाद्रपद शु. अष्टमीस
गुरुवार आला असता गुरूच्या सुवर्ण मूर्तीची पूजा करावी, असा या व्रताचा विधी आहे.
दूर्वाष्टमी
भाद्रपद शु. अष्टमीला हे
नाव आहे. या दिवशी दूर्वाविषयी व्रत करावे, असे सांगितले आहे. या
व्रतास दूर्वेसह गौरी, गणेश व शिव यांची पूजा करावयाची असते. अपत्यहीन स्त्रिया हे
व्रत करतात. पूजा झाल्यानंतर आठ ग्रंथीनी युक्त असा दोरा डाव्या हातात बांधतात.
पुढील श्लोकाने दूर्वेची प्रार्थना करतात-
त्वं दुर्वेऽमृतनामासि
पूजितासि सुरासुरै: ।
सौभाग्यसन्ततिं दत्व
सर्वकार्यकारी भव ॥
यथा शाखाप्रशाखाभिर्विस्तृतासि
महीतले ।
तथा ममापि सन्तानं देहि
त्वमजरामरम् ॥
अर्थ - हे दुर्वे, अमृत हे तुझे नाव आहे. तू देवदानवादिकांकडून पूजित आहेस. तू मला सौभाग्य आणि
संतती देऊन सर्व कार्ये सिद्ध करणारी हो. ज्याप्रमाणे शाखाप्रशाखांनी तू पृथ्वीवर
पसरतेस, त्याप्रमाणे मला अजरामर असे पुत्रसंतान दे. (माझा वंशवृक्ष
तुझ्यासारखा शाखा - प्रशाखांनी युक्त कर.
या व्रताचे दुसरे पर्याय व्रत.
भाद्र. सु. सप्तमीस उपास
करावा. अष्टमीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून पवित्र जागी उगवलेल्या दूर्वांवर
शिवलिंगाची पूजा करावी. शिवाला दूर्वा, शमी, पुष्पमाला वाहाव्यात. खजूर, खोबरे व महाळुंग यांचा नैवेद्य दाखवावा. अक्षतायुक्त दह्याचे अर्घ्य द्यावे.
ब्राह्मणांना विविध फळांची वायने द्यावी. त्या दिवशी केवळ फलाहार करावा.
उद्यापनाच्या वेळी पूजाहवन करावे. ब्राह्मणांना व आप्तेष्टांना तिळाच्या व
कणकीच्या पदार्थांचे भोजन घालावे.
फळ - सौभाग्य व संतती यांचा
लाभ व इच्छापूर्ती.
महालक्ष्मी व्रत
भाद्र. शु. अष्टमीपासून ते
आश्विन व. अष्टमीपर्यंत दररोज १६ चुळा भरून प्रात:स्नान करावे. चंदनाच्या
काष्ठाची लक्ष्मीची मूर्ती स्थापन करून तिच्याजवळच सुताचा दोरा घेऊन त्याला १६
गाठी घालून त्याचा तातू करावा. त्यावेळी लक्ष्मीची पूजा करावी व लक्ष्म्यै नम:
म्हणून प्रत्येक गाठीची पूजा करावी नंतर
धनं धान्यं धरांहर्म्यं
कीर्तिसमायुर्यश: श्रियम् ।
तुरगान् दन्तिन: पुत्रान्
महालक्ष्मि प्रयच्छ मे ।'
हा मंत्र म्हणून वरील दोरा
उजव्या हातात बांधावा. हिरव्या दूर्वेची १६ पाने व १६ अक्षता हातात घेऊन कथा श्रवण
करावी याप्रमाणे करून आश्विन व. अष्टमी दिवशी विसर्जन करावे.
राधा अष्टमी
भाद्रपद महिन्याच्या दोन्ही
पक्षांतील अष्टमींना 'राधा अष्टमी' असे म्हणतात. राधेच जन्म भाद्रपद शु. सप्तमीस
झाला असे समजतात आणि अष्टमीच्या दिवशी तिची पूजा करतात. पूजाविधी असा-
प्रात:काली स्नानानंतर
व्रतसंकल्प करावा व एका मंडलात मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश ठेवावा. त्यावर
असलेल्या तांब्याच्या तामनात राधेची सुवर्णमूर्ती ठेवून तिला वस्त्रे वाहावीत. मग
पूजा करून ती मुर्ती ब्राह्मणास दान द्यावी. शक्य असेल तर उपास करावा. काही लोक
या व्रतात राधाकृष्णाची पूजा करतात.
फल - पापनाश
भद्रा
१४:२९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी
हा काल निंद्य मानला आहे.संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
श्रीमहालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय? महत्वपूर्ण माहिती
ReplyDeleteभाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस जेष्ठागौरी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती जेष्ठागौरीविषयी उपलब्ध आहे.
जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठागौरी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली- वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात. वेद वाड्मयत सुद्धा ‘नमो जेष्ठाच च कनिष्ठाय च’ ‘स्तेतानां पतये नमः’ अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.
याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात विष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण अल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा अलक्ष्मी अश्र्वत्थवृक्षा खाली रडत बसली.
एकदा विष्णू तिथून जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.
या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो.
गौरीचे आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचेआवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
अष्टमीच्या दिवशी गौरीपूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे ‘जेष्ठा गौरी व्रत’ असे मानतात.
गौरी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे. जेष्ठा गौरीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो..