Tuesday, 22 September 2015

दिनविशेष - २४ सप्टेंबर २०१५

तिथी
 भाद्रपद शु ११ (२१:५०)
वार
 गुरुवार
नक्षत्र
 श्रवण (२८:३९)
योग
 अतिगंड (११:४२)
करण
 वणिज (११:०२)

परिवर्तिनी एकादशी

या दिवशी भगवान श्री विष्णू आपली कूस बदलतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे नाव आहे.

शुक्लैकादशी

भाद्रपद शु. पद्मा एकादशीला पहाटे प्रात:स्नानादी कृत्ये झाल्यावर भगवंताची यथाविधी पूजा करावी. उपवास करून रात्री हरिजागरण करावे व दुसरे दिवशी पूर्वान्ही (सकाळी) पारणे करावे जर सकाळी श्रवणनक्षत्राच्या मध्याच्या २० घटिका असतील तर भोजन करू नये. तसेच, जर मध्यान्हीच्या पुर्वी श्रवणाचा मध्य अंश नसेल, तर पाणी पिऊन पारणे करावे.
जर या दिवशी श्रवणनक्षत्र असेल तर या एकादशीला 'विजया एकादशी' म्हणतात. या व्रताने सर्व मनोरथ पूर्ण होतात. या दिवशी 'श्रीवामना'ची पूजा करतात. व्रत करणार्‍याने त्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर 'श्रीवामना'ची सोन्याची मूर्ती करून तिची गंधफुलांनी यथाविधी पूजा करावी व त्यावेळी 'मत्स्य, कूर्म, वराह' आदी नामांचा उच्चार करावा. रात्री जागरण करावे. दुसरे दिवशी असलेले देय द्रव्य ब्राह्मणांना दान देऊन, त्यांना भोजन घालून नंतर आपण स्वत: जेवावे व व्रताची सांगता करावी.

कटिपरिवर्तनोत्सव

भाद्रपद शु. एकादशीला भगवंताचा कटिपरिवर्तन ( कूसबदल ) उत्सव करतात. त्या दिवशी 'देवप्रबोधिनी' एकादशीप्रमाणे सर्व विधी करतात. देवाला स्नान, रथयात्रा वगैरेसह समारंभाने आणून सायंकाळी महापुज व नीरांजनांनी आरती करून रात्री देवास उजव्या कुशीवर निजवावे व जागरण करावे. दुसरे दिवशी सकाळी '
'वासुदेव जगन्नाथ प्राप्तेअयं द्वादशी तव ।
पार्श्‍वेन परिवर्तस्व सुखं स्वापिहि माधव ॥'
अशी प्रार्थना करून पारणे सोडावे. राजपुतान्यात या उत्सवाला' जलझूलनी' असे नाव असून सामान्यपणे अथवा विशेष प्रकाराने हा साजरा करतात.

कर्मावर्मा

हे व्रत उत्तरभारतात प्रचलित आहे. हे व्रत भाद्र. शु. एकाद्शीस सायंकाळी करतात. या दिवशी बायका आपल्या परसात दोन खळगे करून एकात पाणी व दुसर्‍यात दूध ओततात. त्या दोन खळग्यांच्या मध्यभागी कुशतृणाचे रोप लावतात. जितके भाऊ असतील, तितकी कुशाची पाती आपल्या केसात खोचतात. विष्णूची पूजा करून केवळ फलाहार करतात. दुसर्‍यादिवशी खळग्यातले दूधपाणी, कुश, निर्माल्य सर्व नदीत नेऊन सोडतात. ब्राह्मणाला शिधा देतात व व्रताचे पारणे करतात. या व्रतामुळे स्वत:च्या व बंधूंच्या सर्व आपत्ती दूर होतात, अशी समजूत आहे.

घबाड

२१:५० नंतर २८:३९ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
चंद्र नक्षत्र : श्रवण
तिथी: १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३+१२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

बकरी ईद / ईद-उल-जुहा

इस्लाम धामियांचा हा एक प्रमुख सन आहे. हजारात इब्राहीमने याच दिवशी स्वत:चा पुत्र हजारात इस्माइल याचा खुदाच्या आज्ञेनुसार खुदा साठी त्याग केला होता. नंतर अल्लाहने त्याला जीवनदान दिले अशी कथा प्रचलित आहे. म्हणून या दिवशी आपल्या सर्वात आवडत्या गोष्टीचा त्याग करतात.

भद्रा


११:०२ नंतर २१:५० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment