तिथी
|
भाद्रपद शु ३ (२०:०२)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
चित्रा (२२:४३)
|
योग
|
ब्रह्मा (१७:३१)
|
करण
|
तैतिल (०६:४६)
|
हरतालिका तृतिया
हरतालिका हे व्रत
पार्वतीने शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केले होते असे मानले जाते.
तेव्हांपासून आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे
व्रत करावे असा प्रघात आहे आणि लग्नानंतर मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून आणि
जन्मोजन्मी असाच जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात. हरतालिका
या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने
पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा
अर्थ आहे. मंगळागौरीच्या पूजेप्रमाणेच हिरव्या बांगडया २, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा इ. साहित्य आणून, शंकराची प्रतिमा
म्हणून वाळूची पिंड करून पूजा करतात. सात प्रकारची प्रत्येकी सात सात पाने गोळा
करून ती शंकराला वहातात. त्यापैकी मुख्य पान म्हणजे रूईचे व बेलाचे पान. ही दोन्ही
पाने ह्या पूजेत आवश्यकच आहेत.
पूजा झाल्यावर हरतालिकेची
आरती म्हणतात व कहाणी वाचतात. त्यादिवशी बायका कंदमुळाशिवाय काहीही खात नाहीत.
दिवसभर पाणीसुध्दा पित नाहीत. रात्री बारा वाजता रूईच्या पानावर मध घालून चाटतात.
दुसरे दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडतात. हरतालिकेच्या दिवशी
बायका एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात खेळ, फुगडया, गाण्याच्या भेंडया खेळतात. या दिवशी स्त्रिया इतर
स्त्रियांना सौभाग्यवाणे देतात. दुस-या दिवशी उत्तरपूजा करतात.
कथा
एके दिवशी
शंकरपार्वती कैलासपर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे, आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. आणि मी कोणत्या
पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य
श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा
श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच
तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.
हे व्रत भाद्रपद
महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता
सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर
झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या
बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्याला
चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं
कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली
आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे
मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला.
त्यांने ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून
विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या
सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या
बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय
करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं.
तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास
केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद
शुद्ध तृतियेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं.
नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू
म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी
गुप्त झालो.
पुढे दुसर्या
दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा
बाप तिथं आला: त्यांन तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत
सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही
दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण
झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.
ज्या ठिकाणी हे
व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी
घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व
रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक
नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही
खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर
सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं
विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ
संपूर्ण.
आरती
जय देवी हरतालिके| सखी पार्वती अबिके|
आरती ओवळीतें| ज्ञानदीपकळिके||
हर अर्धंगी वससी| जासी यज्ञा माहेरासी|
तेथें अपमान पावसी| यज्ञकुंडींत गुप्त होसी||
जय देवी हरतालिके| सखी पार्वती अबिके|
रिघसी हिमाद्रीच्या पोटी| कन्या होसी तू गोमटी|
उग्र तपक्ष्चर्या मोठी| आचरसी उठाउठी||
जय देवी हरतालिके| सखी पार्वती अबिके|
तापपंचाग्रिसाधनें| धूम्रपानें अधोवदनें|
केली बहु उपोषणें| शंभु भ्रताराकारणें||
जय देवी हरतालिके| सखी पार्वती अबिके|
लीला दाखविसी दृष्टी| हें व्रत करिसी लोकांसाठी|
पुन्हा वरिसी धूर्जटी| मज रक्षावें संकटीं||
जय देवी हरतालिके| सखी पार्वती अबिके|
काय वर्ण तव गुण| अल्पमति नारायण|
मातें दाखवीं चरण| चुकवावें जन्म मरण||
जय देवी हरतालिके| सखी पार्वती अबिके|
जय देवी हरतालिके| सखी पार्वती अबिके|
आरती ओवळीतें| ज्ञानदीपकळिके||
स्वर्ण गौरी व्रत
हे व्रत पतीचे
आरोग्य व कुटुंब यांचेसाठी केले जाते.
ॐ सर्व मंगल
मांगल्ये
शिवे सर्वार्थ
साधिके !
शरण्ये त्रंबके
गौरी
नारायणी
नमोस्तुते !
या मंत्राने पूजा
केली जाते.
वराह जयंती
वराह अवतार हा
विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. वराह अवतार भाद्रपद शुक्ल तृतीयेस अपराह्नकाळीं झाला. या
दिवशी भगवंताचा जयंती व उत्सव साजरा करावा.
मत्स्य अवतार
|
चैत्र शुक्ल
तृतीया
|
अपराह्नकाळी
|
कूर्म अवतार
|
वैशाख पौर्णिम
|
सायंकाळी
|
वराह अवतार
|
भाद्रपद शुक्ल
तृतीया
|
अपराह्नकाळी
|
नृसिंह अवतार
|
वैशाख शुक्ल
चतुर्दशी
|
सायंकाळीं
|
वामन अवतार
|
भाद्रपद शुक्ल
द्वादशी
|
माध्यान्हकाळी
|
परशुराम अवतार
|
वैशाख शुक्ल
तृतीया
|
माध्यान्हकाळीं
झाला. ( हा प्रदोषकाळी झाला असे
अन्य मत असून सध्या प्रचार ही प्रदोषकाळी मानण्याविषयीच आहे. )
|
राम अवतार
|
चैत्र शुक्ल
नवमी
|
माध्यान्हकाळी
|
कृष्ण अवतार
|
श्रावण कृष्ण
अष्टमी
|
मध्यरात्री
|
बौध्द अवतार
|
अश्विन शुक्ल
दशमी
|
सायंकाळी
|
कल्की अवतार
|
श्रावण शुक्ल
षष्ठी
|
सायंकाळी
|
वराह अवतार कथा
ब्रह्मदेवाच्या
नाकाच्या छीद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एक वराह शिशु बाहेर पडला. आश्चर्याची
गोष्ट अशी की आकाशात असलेला तो वराह शिशु ब्रह्मदेवाच्या देखतच मोठा होऊन क्षणातच
हत्तीएवढा झाला. त्यांचे शरिर अत्यंत कठोर होते. त्वचेवर राठ केस होते. पांढरी
दाढी आणि डोळयात तेज होते. स्वत:चा खेद नाहीसा करणारे ते मायामय वराहाचे गुरगुरणे
ऐकून जन, तप व सत्य लोकातील
मुनींनी तीन वेदातील मंत्रांनी त्याचे
स्तवन केले. त्या यज्ञ वराहणे उदका मध्ये प्रवेश केला व पृथ्वीचा माग काढला. त्या
वराह भगवानाच्या उडीने विदीर्ण महासागर भगवानाला शरण गेला. निमग्न झालेली पृथ्वी
स्वत:च्या दाढेने वराहाने वर काढली.हाती गदा घेऊन चालून येणाऱ्या मदमत्त
हिरण्याक्ष दैत्याचा त्याने उद्कामध्येच लीलेने वध केला. शूभ्रदंताग्रावर गजलीलेने
पृथ्वी उचलून धरनाऱ्या व नीलवर्ण असलेल्या त्या वराहाला पाहून ब्रह्मदेवादी देवानी
हात जोडून त्याची स्तोत्रांनी स्तुती केली. ही कथा जो श्रवण करतो तो ब्रह्महत्ये
पासून मुक्त होतो व नारायनाशी त्याला ऐक्य प्राप्त होते.
कोटी संवत्सरव्रत:
भाद्रपद शु. तृतीयेस हे
व्रत करतात. व्रतावधी-चार वर्षे. एक लक्ष तांदूळ किंवा तीळ दुधात घालून वाटतात व
त्या गोळ्याची पार्वतीची मूर्ती बनवतात. त्या दिवशी उपवास करून तिची पूजा करतात.
व्रताचे फल - दारिद्र्यनाश, चांगला पती व चांगली संतती यांचा लाभ व्हावा म्हणुन स्त्रिया हे व्रत करतात.
याला लक्ष्मेश्वरी व्रत असेही म्हणतात.
गिरितनयाव्रत
भाद्रपद किंवा
मार्गशीर्ष शु. तृतीयेस या व्रतास आरंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. हे व्रत प्रत्येक
महिन्यात निरनिराळ्या नावांनी व फुलांनी गौरीची पूजा करून करतात.
गोपदत्रिरात्र व्रत
व्रतारंभ भाद्रपद
शु. तृतीयेस किंवा चतुर्थीस करतात. हे व्रत सूर्योदयाच्या वेळी करावयाचे असते.
त्याचा विधी-गाय व लक्ष्मीनारायण यांची तीन दिवस पूजा. गाईच्या शिंगांना व शेपटीला
दही व तूप लावणे व उपवास.
'माता रुद्राणाम्'
या मंत्राने
गाईची पूजा करावी. भाद्रपदात व्रतारंभ न करता आल्यास तो कार्तिकात केला तरी चालतो.
मन्वादी
१४ मन्वंतराच्या आरंभ
झाल्या अशा १४ तिथीन मन्वादी असे म्हणतात. या मन्वादी १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
१
|
स्वायंभुव
|
चैत्र शुक्ल तृतीया
|
२
|
स्वारोचीस
|
चैत्र शुक्ल पौर्णिमा
|
३
|
उत्तम
|
कार्तिक शुक्ल पौर्णिमा
|
४
|
तामस
|
आषाढ शुक्ल पौर्णिमा
|
५
|
रैवत
|
कार्तिक शुक्ल द्वादशी.
|
६
|
चाक्षुस
|
आषाढ शुक्ल दशमी.
|
७
|
वैवस्वत
|
ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
|
८
|
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
|
९
|
दक्ष सावर्णी
|
आश्विन शुक्ल नवमी.
|
१०
|
ब्रह्म सावर्णी
|
माघ शुक्ल सप्तमी
|
११
|
धर्म सावर्णी
|
पौष शुक्ल एकादशी.
|
१२
|
रुद्र सावर्णी
|
भाद्रपद शुक्ल तृतीया.
|
१३
|
देव / रुची
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल अमावस्या.
|
१४
|
इंद्र/ भूती
सावर्णी
|
श्रावण कृष्ण अष्टमी.
|
‘मनु’ बाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत
म्हटले आहे
महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !!
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !!
(श्रीमद्भ्गव्दगीता
अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण
म्हणतात हे अर्जुना सात महर्षी जन आणि
त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात
यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.
दग्ध योग
२०:०२ पर्यंत बुधवारी
तृतिया असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे.
पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment