प्राचीन वाङ्मयात सरस्वती ही ब्रह्मदेवांची कन्या
म्हणून उल्लेख आहे. तिला एकदा पुरुरवा या राजाने पाहिले. तिचे अप्रतिम सौंदर्य
पाहून राजा अत्यंत मोहित झाला. पुरुरव्याने त्याची प्रिया उर्वशी- तिच्या
मध्यस्थीने या सरस्वतीला घरी बोलविले. त्या वेळी पुरुरव्याला न राहविल्यामुळे
सरस्वतीचा कौमार्यभंग केला. हे जेव्हा ब्रह्मदेवांना समजले तेव्हा ते रागावले व
दोघांना शाप दिला. सरस्वतीला ते म्हणाले, ""यापुढे भूतलावर तू नदी म्हणून वाहत राहशील.'' त्याप्रमाणे ती "सरस्वती नदी' म्हणून वाहू लागली.
पद्मपुराणात
सृष्टीखंडात सरस्वती नदीची उत्पत्ती सांगितली आहे. ती अशी -
एकदा भूतलावर वडवाग्नीने प्रचंड असा प्रलय मांडला
होता. देव-दानव व सर्व पृथ्वी होरपळून निघत होती. म्हणून ऋषीमंडळींनी
ब्रह्मदेवांना यापासून वाचवण्याची प्रार्थना केली.
तेव्हा ब्रह्मदेवांनी या अग्नीला एका पात्रात कोंडून
ठेवले व ते पात्र सागराकडे घेऊन जाण्यास कन्या सरस्वतीस सांगितले. कन्या सरस्वती
हा अग्नी घेऊन जाण्यास तयार नव्हती; परंतु
पित्याची आज्ञा म्हणून हे अग्निपात्र घेऊन जाऊ लागली; परंतु अग्नीचे तेज तिला सहन न झाल्यामुळे ती त्यामुळे
जलरूप झाली. तिचे नाव "सरस्वती नदी' होय.
ही सरस्वती नदी अत्यंत वेगवान अशी नदी असून, वरुणाच्या मुखात पडते. (ऋग्वेद
6.11.63) हिची निर्मिती प्रजापतीकडून झालेली आहे. ही नदी पर्वतावर उगम पावून
सागराला मिळते; परंतु द्वापारयुगात
तिचे जल आटले व राजस्थान वाळवंटात ती अडकून पडली आहे; परंतु पुढे प्रयाग क्षेत्रात ती गंगा-यमुना या
नद्यांच्या संगमात गुप्त रूपाने येऊन मिळाली असल्याने या संगमाला "त्रिवेणी
संगम' म्हणतात.
सरस्वती देवी म्हणून
उत्पत्ती -
ब्रह्मदेवांनी सबंध सृष्टी निर्माण केली. त्याबरोबर
प्रजोत्पत्तीही केली.ब्रह्मदेवांच्या वामांगापासून शतरूपा राणी व उजव्या अंगापासून
स्वायंभुवमनु निर्माण झाले. या शतरूपा राणीनंतर सावित्री, ब्राह्मणी व सरस्वती या स्त्रिया निर्माण झाल्या.
यातील सरस्वती ही ब्रह्मदेवांची पत्नी झाली.
देवी भागवतात देवीची उत्पत्ती सांगताना सांगितले, की राधा-राणीच्या जिव्हाग्रापासून
या देवीचा जन्म झाला.
ही जेव्हा सगुणरूपात प्रकट झाली, तेव्हा तिने श्रीकृष्णाला वरण्याची
इच्छा प्रदर्शित केली; परंतु
भगवान श्रीकृष्णाला तिच्याबरोबर राहणे योग्य वाटले नाही. सबब त्याने तिला शाश्वत
रूप दाखवले व तिचे समाधान करून तिला परब्रह्मस्वरूपी भगवंताला शरण जाण्यास
सांगितले. तसेच भगवंताच्या आज्ञेने ती ज्ञानी, महात्मे, निष्ठावान
प्रेमळ भक्त यांच्या जिव्हाग्रभागी राहू लागली.
पद्मपुराणात पुष्कर माहात्म्यात असे सांगितले आहे, ""एकदा पृथ्वीवर दीर्घ काळ दुष्काळ
पडला होता. त्याचे निवारण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी यज्ञ करण्याचे ठरविले; परंतु यज्ञ कोठे करावा, हे ठरविताना त्यांनी स्वर्गातून एक
पद्म (कमळ) भूमीवर टाकले. ते पद्म ज्या ठिकाणी पडले ते पुष्करतीर्थ म्हणून
प्रसिद्ध पावले. सबंध भारत देशात पुष्कर क्षेत्री फक्त ब्रह्मदेवांचे मंदिर आहे.
या पवित्र क्षेत्रात ब्रह्मदेवांनी यज्ञ सुरू करताना
त्यांची पत्नी सरस्वती हिला आवाहन केले; परंतु
ती यज्ञकार्यात वेळेवर येऊ शकली नाही; पण
यज्ञकर्माचा मुहूर्त टळू नये म्हणून ब्रह्मदेवांनी इंद्राला दुसरी स्त्री आणण्यास
सांगितले. (कारण यज्ञकर्म हे सपत्नीकांनी व पत्नीबरोबरच करावे, हा दंडक आहे) तेव्हा इंद्राने एक
गोप स्त्री आणून गाईच्या मुखातून तिला काढून तिची शुद्धी केली(एक वेदोक्त/
पुराणोक्त विधी आहे) आणि ती ब्रह्मदेवाजवळ बसविली, ती"गायत्री' म्हणून प्रसिद्ध पावली.
यज्ञकर्म सुरू झाले आणि काही वेळाने आपल्या
सख्यांबरोबर सरस्वती देवी आपल्या लवाजम्यानिशी मंडपात आली. आपल्या जागेवर दुसरी
स्त्री पाहून ती रागावली व तिने सर्वांना शाप दिला. तो असा-
1) ब्रह्मदेवाची पूजा लोक वर्षातून एकदा करतील.
2) इंद्राला कुठल्यातरी परक्या देशात शृंखलाबद्ध
होऊन पडावे लागेल.
3) विष्णूने यात सहकार्य केले म्हणून त्याला
मानवयोनीत गुराखी व्हावे लागेल (श्रीकृष्ण झाले).
4) रुद्रांचा शूरपणा नष्ट होईल.
5) अग्नी सर्वभक्षक बनेल.
6) ब्राह्मण उपाध्याय यापुढे फक्त दक्षिणा
मिळविण्याच्या दृष्टीने धार्मिक विधी, यज्ञकर्म
करतील. नंतर लक्ष्मीदेवीने तिच्याशी मध्यस्थी केली व सरस्वती देवीचा राग शांत
केला.
ब्रह्मदेवाने पुष्कर तीर्थावर सरस्वतीसाठी एक सरोवर
तयार केले. काही दिवसांनी सरस्वती, लक्ष्मी, गंगा यांचे तिघींचे एकमेकांशी
भांडण झाले.त्यामुळे नारायण परमात्म्याने सांगितले, की सरस्वती एक अंशरूपाने पृथ्वीवर नदी म्हणून राहील व
एक अंशरूपाने ब्रह्मदेवांची पत्नी म्हणून राहील.
कलियुगाची पाच हजार वर्षे लोटली म्हणजे ती नदीचा
गुप्तपणा सोडून उघडपणे वाहू लागेल. त्यानंतर ब्रह्मदेवाने तिला आवाहन केले, तेव्हा ती म्हणाली, ""मला पापी लोकांचा संपर्क न व्हावा
म्हणून मी गुप्त राहीन व आपली आज्ञा होता क्षणी, या पुष्कर क्षेत्रात प्रकट होईन.''
तसेच लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे धनवान
माणूस बुद्धिमान असतो, असे
नाही व बुद्धिमान माणूस धनवान होईलच, असे
असू शकत नाही. केवळ ईशकृपा व सद्गुण संपदेने या एकत्र नांदताना दिसतात.
सरस्वती देवीचे कार्य -
ऋग्वेदात या देवीचे गुणगान असे केले आहे, की ती ब्रह्मदेवाची पत्नी, सर्वांची रक्षणकर्ती, अन्नपाणी पुरविणारी, सर्वांना सामर्थ्यसंपन्न करणारी, दान देणाऱ्यांना उत्तम वरदान
देणारी, धन्याला संतुष्ट करणारी, यज्ञकर्मात विपुल धान्य देणारी
आहे. तसेच शुक्ल यजुर्वेदात तिचे वर्णन आले आहे. या वेदात तिला इडा, भारती व सरस्वती या प्रजाय देवता
(नव निर्माण करणाऱ्या) असून मरुत, विराट, गायी या इंद्रिय शक्ती व
दीर्घायुष्य देवो, ही
प्रार्थना करतात.
या सरस्वतीला वेळ, काळ व कार्यानुरूप भारती, ब्राह्मी, पुटकारी, शारदा,वागीश्वरी, वीणा
इत्यादी नावे प्राप्त झाली आहेत.
प्रामुख्याने ही सरस्वती विद्यादेवता म्हणून अवतीर्ण
झाली आहे. ब्रह्मदेवांची आज्ञा म्हणून तिने सत्ययुग संपल्यावर त्रेतायुगाच्या
प्रारंभी पवित्र व योग्य मानवाच्या जिव्हाग्रावर प्रवेश केला. या भूतलावर प्रथम
तिने तमसा नदीवर एका ऋषींच्या जिव्हेवर प्रवेश केला. ते ऋषी म्हणजे वाल्मीकी होत.
व्याधाने एका क्रौंच पक्ष्याला ठार केले. त्याची प्रिया शोक करीत असता वाल्मीकींनी
त्या पक्ष्याची शुश्रूषा केली. हे करुणाजनक दृश्य पाहून सरस्वतीला दया आली आणि
त्याचे वर्णन करण्यासाठी ऋषींच्या मुखात प्रवेश केल्याबरोबर या भूतलावर पहिले
काव्य बाहेर पडले.
ते म्हणू लागले-
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः सम।
यत्क्रौंच मिथुनादेकमवधीः काममोहितम्।।
या काव्यामुळे वाल्मीकींना आदिकवीचा मान मिळाला.
ऋग्वेदात 10-32-12 मध्ये सरस्वतीचा संबंध बुद्धीशी व
अमृत शब्दाबरोबर जोडला आहे. कारण वेदवाङ्मयात "ज्ञा' वर्गातील काही देवता स्वीकारल्या आहेत. या "ज्ञा' वर्गातील वाग्देवता म्हणून ही
सरस्वती आहे. या "ज्ञा'वर्गातील
देवता, देवतांचे, तसेच मानवाचे कार्य समृद्धी व
फलोत्पादन करणाऱ्या म्हणून आहेत.
त्यामुळे मातृशक्ती म्हणून हिचे महत्त्व मानले आहे.
सरस्वती देवी बुद्धीला गतिमानता व तेजस्विता देत असल्याने सर्व ऋषी, साधू, संत महात्मे हिचे गुणगान करतात. हीच भगवती सरस्वती
भाषा, काव्य, कला, अलंकार इ.गुणांची जननी म्हणून मानली आहे.
ही सरस्वती देवी हंसवाहिनी आहे. नाथ महाराज तिचे
वर्णन करतात-
सारासार निवडी जनी।
त्या हंसावरी हंसवाहिनी।।
अशी ही देवता असून, सर्व वस्तुमात्रांमध्ये योग्य निवडीचे ज्ञान देणारी
ही देवता आहे.
सरस्वती देवीचे स्वरूप -
सरस्वती देवी ही शुभ्रकमलावर किंवा हंसावर आरूढ
दिसते. हिचा वर्ण शुभ्र असून शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. ही चतुर्भुजा असून
उजव्या हातात अक्षमाला व व्याख्यानमुद्रा आहे. डाव्या हातात पुस्तक व कमळ आहे. कधी
स्फटिक माला गळ्यात असतात, तर
कधी वीणा हातात असते. गळ्यात यज्ञोपवीत असून अंगावर रत्नजडित अलंकार आहेत. शृंगेरी
मठात या वर्णनाबरोबर सरस्वतीच्या हातात माला, अमृतकुंभ, पोपट
व हंसवाहनी असे स्वरूप स्वीकारले आहे.
असे या देवीचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment