Saturday, 21 May 2016

दिनविशेष - २१ मे २०१६


तिथी
 वैशाख पौर्णिमा (२६:४४)  
वार
 शनिवार     
नक्षत्र
 विशाखा (१९:१०)
योग
 परिघ (२४:५९)
करण
 विष्टि (१३:४६)

वैशाखस्नान समाप्ति

चैत्र शुक्ल पौर्णिमेपासून वैशाख शुक्ल पौर्णिमेपर्यंत प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी कोठेही तीर्थक्षेत्री, अथवा नदी, विहीर, आड,तुळे किंवा सरोवर किंवा स्वतःच्या घरीदेखील शुद्ध थंड पाण्याने स्नान करावे आणि नित्य आन्हिक झाल्यावर
'ॐ नमो भगवते वासुदेवाय'
किंवा
'हरे राम हरे राम'
 या मंत्राचा यथाशक्ती जप करुन एकच वेळ भोजन करावे. एकतीस दिवसापर्यंत असा क्रम ठेवल्यास अनेक प्रकारचे रोग व दोष दुर होतात व त्याचा प्रभाव आणि पुण्य वाढतात.
या व्रताची समाप्ति होत आहे.

बुद्धपोर्णिमा

वैशाख शुध्द पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला.  वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा करतात.

कूर्मजयंती

वैशाख पौर्णिमेस कूर्म जयंती साजरी करतात.
या दिवशी भगवान विष्णूंनी कूर्मावतार घेतला होता. आणि मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर धारण करून समुद्रमंथनाला मदत केली होती.
हादिवस उत्पादन संबंधित सर्व कार्यांसाठी अतिशय शुभ मानला जातो.
भूमी पूजन,नवीन वस्तू पूजन किंवा वस्तू दोष काढण्यासाठी देखील हा दिवस शुभ मानला आहे.

श्री विष्णू अवतार

मत्स्य अवतार
चैत्र शुक्ल तृतीया
अपराह्नकाळी
कूर्म अवतार
वैशाख पौर्णिमा
सायंकाळी
वराह अवतार
भाद्रपद शुक्ल तृतीया
अपराह्नकाळी
नृसिंह अवतार
वैशाख शुक्ल चतुर्दशी
सायंकाळीं
वामन अवतार
भाद्रपद शुक्ल द्वादशी
माध्यान्हकाळी
परशुराम अवतार
वैशाख शुक्ल तृतीया
माध्यान्हकाळीं झाला. (हा प्रदोषकाळी झाला असे अन्य मत असून सध्या प्रचार ही प्रदोषकाळी मानण्याविषयीच आहे. )

राम अवतार
चैत्र शुक्ल नवमी
माध्यान्हकाळी
कृष्ण अवतार
श्रावण कृष्ण अष्टमी
मध्यरात्री
बौध्द अवतार
अश्विन शुक्ल दशमी
सायंकाळी
कल्की अवतार
श्रावण शुक्ल षष्ठी
सायंकाळी

पुष्टिपति विनायक जयंती / वैशाखी व्रत

हि खूप मोठी शुभ तिथी आहे. या दिवशी दानधर्मादी अनेक पुण्य कृत्ये करतात. ही जर सूर्योदयापासून दुसरे दिवशी सूर्योदयापर्यंत असेल, तर अधिक प्रशस्त मानली आहे. एरवी ती कार्यानुसार घ्यावी.
१)      धर्मराजासाठी पाण्याने भरलेला कुंभ व मिष्टान्न दान दिल्यास गोदानाचे पुण्य मिळते.
२)      पाच अगर सात ब्राह्मणांना हलवा ( शर्करायुक्त तीळ ) दिला, तर सर्व पापांचा क्षय होतो.
३)      सारवलेल्या भूमीवर तीळ पसरून त्यावर सपुच्छ मृगाजिन शिंगासह अंथरून व उत्तम प्रकारच्या वस्त्रासह दान केल्यास महान फळ मिळ्ते.
४)      तिळाने स्नान करून तूपसाखर आणि तिळाने भरलेला कलश भगवान विष्णूच्या नाममंत्राने आहुती द्यावी, अगर तीळ आणि मध यांचे दान करावे. तिळाच्या तेलाचे दिवे लावावेत. तिलतर्पण करावे, अगर गंगास्नान केल्याने सर्व पापांतून मुक्त होतो.
५)      जर या दिवशी एकभुक्त राहून पौर्णिमा, चंद्रमा व सत्यनारायणव्रत केले, तर सर्व प्रकारची सुखे, संपदा आणि श्रेयस यांची प्राप्ती होते.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

भद्रा

१३:४६ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

उज्जैन कुंभस्नान महापर्व

कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.
भारतामध्ये बारा वर्षांत अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा भरतो.

मुख्यत: गुरु आणि रवि  व चंद्र यांच्या ठराविक स्थितीनुसार ठराविक ठिकाणी कुंभमेळा भरतो.
हरिद्वार
सूर्य मेष राशीत असतांना आणि गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो,  तेव्हा
उज्जैन
सूर्य मेष राशीत आणि गुरु सिंह राशीत असतो,  तेव्हा
त्र्यंबकेश्वर- नाशिक
गुरु आणि सूर्य हे दोन्ही सिंह राशीत येतात, तेव्हा
प्रयाग -त्रिवेणी संगम
वृषभ राशीत गुरु आणि मकर राशीत चंद्र अन् सूर्य असतात, तेव्हा

आख्यायिका


अमृतकुंभप्राप्तीसाठी देव आणि दानव (राक्षस) यांनी एकत्र येऊन क्षीरसागराचे मंथन करण्याचे ठरवले. या समुद्रमंथनार्थ मेरु (मंदार) पर्वत घुसळण्यासाठी सर्पराज वासुकीला दोरी होण्याची विनंती करण्यात आली. वासुकी नागाने दोरी होऊन मेरु पर्वताला गुंडाळल्यानंतर त्याच्या मुखाच्या दिशेने दानव आणि शेपटीच्या दिशेने देव या पद्धतीने समुद्रमंथन करण्यात आले. त्या वेळी समुद्रमंथनातून अनुक्रमे हालाहल विष, कामधेनु (गाय), उच्चैःश्रवा (शुभ्र घोडा), ऐरावत (चार दंत असलेला हत्ती), कौस्तुभमणी, पारिजात कल्पवृक्ष, रंभा आदी देवांगना (अप्सरा), श्री लक्ष्मीदेवी (श्रीविष्णुपत्नी), सुरा (मद्य), सोम (चंद्र), हरिधनु (धनुष्य), शंख, धन्वंतरि (देवतांचा वैद्य) आणि अमृतकलश (कुंभ) ही चौदा रत्ने बाहेर आली धन्वंतरि देवता अमृतकुंभ हाती घेऊन समुद्रातून वर येताच देवांच्या मनात आले की, दानव अमृत पिऊन अमर झाले, तर उत्पात माजवतील. यासाठी त्यांनी इंद्रपुत्र जयंत याला खूण केली. त्यासरशी तो धन्वंतरीच्या हातातील अमृतकुंभ घेऊन स्वर्गाच्या दिशेने रवाना झाला. हा अमृतकुंभ प्राप्त करण्यासाठी देव-दानव यांच्यात १२ दिवस आणि १२ रात्री, म्हणजे मनुष्याची १२ वर्षे युद्ध झाले. या युद्धात १२ वेळा अमृतकुंभ खाली पडला. या वेळी सूर्यदेवाने अमृतकलशाचे रक्षण केले आणि चंद्राने कलशातील अमृत उडून जाणार नाही, याची दक्षता घेतली आणि गुरूने राक्षसांचा प्रतिकार करून कलशाचे रक्षण केले. त्या वेळी ज्या १२ ठिकाणी अमृतकुंभातील थेंब पडले, त्या ठिकाणी वरील ग्रहांच्या विशिष्ट योगाने कुंभपर्व मानले जाते. या १२ स्थानांत भूलोकातील प्रयाग (अलाहाबाद), हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक यांचा समावेश होतो. उर्वरित स्थाने अन्य लोकांत आहेत. कुंभपर्वात या अमृत कलशाचेही स्मरण केले जाते.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

2 comments:

  1. // श्री स्वामी समर्थ //
    अतिशय छान माहिती .
    विनायक जोशी

    ReplyDelete
  2. // श्री स्वामी समर्थ //
    अतिशय छान माहिती .
    विनायक जोशी

    ReplyDelete