Sunday, 8 May 2016

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया

अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी दान, होम, जप व पितरांचे तर्पण करतात.या दिवशी जप, दान, होम इ. केले असता ते अक्षय्य होते असे मानले जाते. या दिवशी आपणांस अत्यंत प्रिय असेल ते दान करावे.

या दिवशी रोहिणी नक्षत्र व बुधवार असा योग असेल तर तो महापुण्यकारक असतो.

गौरीहर दोलोत्सव समाप्ति

गौरीहर दोलोत्सावाची या दिवशी सांगता होते. म्हणून स्‍त्रिया या दिवशी हळदीकुंकू करून सुवासिनींना भोजनास बोलावून त्यांचा सत्कार करतात. कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळाची करंजी देतात. या शिवाय बत्तासे, मोगर्‍याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेली हरबर्‍यांनी ओटी भरतात.

तिसरी तीज


श्री बसवेश्वर जयंती

समाजसुधारक बसवण्णा/बसवा/बसवेश्वर यांचा जन्म म्हैसूर (आजचा कर्नाटक) राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या बागेवाडी या तालुक्यात कम्मेकुळ या गावात, वैशाख शुद्ध तृतीया इ.स. ११३४ रोजी झाला. (जन्म : ३० मार्च, इ.स. ११३४ - मृत्यू : इ.स. ११६७) त्यांचे वडील मादीराज आणि माता मादलांबिका.
हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला लिंगायत पंथ या नावाने ओळखले जाते.
बसवण्णांनी मंगळवेढा येथे "जगातील पहिली लोकशाही संसद म्हणजेच 'अनुभव मंडपाची' स्थापना केली. या अनुभव मंडपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. अनुभव मंडप म्हणजे जगातील पहिली संसद.

कल्पादि

ब्रह्मदेवाच्या  दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)      चैत्र - शुक्ल ५,
२)      चैत्र – कृष्ण ५
३)      वैशाख – शुक्ल ३
४)      कार्तिक - शुक्ल ७
५)      मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)      माघ – शुक्ल १३
७)      फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.

युगादि

ज्या तिथीला नवीन युगाचा आरंभ झाला त्या तिथीला युगादि असे म्हणतात. ४ युगांच्या आरंभीच्या ४ तिथी पुढील प्रमाणे आहेत.
१)
कृतयुग
 कार्तिक शुक्ल ९
२)
त्रेतायुग
 वैशाख शुक्ल ३
३)
द्वापारयुग
 माघ कृष्ण अमावास्या
४)
कलियुग
 भाद्रपद कृष्ण १३

जलकुंभ व पंखादान

मातीचे दोन घट पाण्याने भरून एकात तांदूळ व दुसर्यात तील घालून त्यांना दोरा गुंडाळावा व ते धान्यावर ठेवावेत. ब्रह्मा-विष्णु-शिव स्वरूपात त्यांची पूजा करून दान करावे. म्हणजे पितर तृप्त होतात आणि मनोरथ पूर्ण होतात.

शुक्र लोप

पूर्व दिशेला शुक्राचा अस्त होत आहे.
ग्रहांचे सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच ‘अस्त’ असे म्हणतात. आणि तोच ग्रह सूर्यापासून ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस होऊ लागते. त्याला ‘उदय’ असे म्हणतात.
सूर्यापासून प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे ‘कालांश’ असे संबोधतात.
ग्रह आणि त्यांचे कालांश :
बुध
१३
वक्री बुध
१२
शुक्र
वक्री शुक्र
७||
मंगळ
१७
गुरु
११
शनी
१५

शुक्र हा अतिशय तेजस्वी आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर किंवा सायंकाळी सुर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर सुमारे तीन तासापर्यंत दिसू शकतो.
शुक्र हा शुभग्रह असल्यामुळे तो अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
अस्त होण्यापूर्वी काही दिवस त्याच्या तेजाच्या वार्धक्याचे व उदयानंतर काही दिवस तेजाच्या बालात्वाचे म्हणूनही धर्म कार्यात वर्ज सांगितले आहेत.
बालत्व / वृद्धत्व
दिशा
दिवस
बालत्व
पूर्वेस उदय
१५ / १० / ७ / ५ / ३ दिवस
बालत्व
पश्चिमेस उदय
१५ / १० / ७
वृद्धत्व
पूर्वेस अस्त
१५ / १० / ७
वृद्धत्व
पश्चिमेस अस्त
१५ / १०/ ७ / ५

अमृत योग

२४:०९ पर्यंत सोमवारी मृग नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

भद्रा

२५:३६ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

मुस्लीम शाबान मासारंभ


मुस्लीम कालगणनेनुसार शाबान मास आरंभ होत आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

1 comment:

  1. विश्‍वगुरू बसवेश्‍वर
    (इ. स. 1134 ते इ. स. 1196)

    ----------------------------
    संक्षिप्त जीवन चरित्र

    परमात्म्याचा प्रेषित म्हणून बाराव्या शतकात जन्म घेऊन जगाला शांतीचा अन् समतेचा संदेश देणारा ‘लिंगायत’ हा धर्म बसवेश्‍वरांनी स्थापिला. इंगळेश्‍वर बागेवाडीमध्ये शैव ब्राम्हण दांपत्य मादरस-मादलांबिकेचे पुत्र होऊन आनंदनाम संवत्सर, वैशाख मास, अक्षय तृतीया (दि. 30-4-1134) रोहिणी नक्षत्रामध्ये म. बसवण्णांचा जन्म झाला. कोणत्याही स्वरूपाची रूढी-परंपरा, अंधश्रध्दा न मानता सत्यान्वेषक होऊन घर सोडून कुडलसंगम येथील गुरूकुलाकडे आले. शास्त्राध्यायन आणि योगाभ्यासामध्ये बालपण घालवून तरूणपणात पदार्पण केले. लोकमनामध्ये घर करून राहिलेली अंधश्रध्दा, कर्मकांड, जातीयता आदींचा परिहार करण्यासाठी बसवेश्‍वरांनी महान कार्य केले.

    दि. 14-1-1155 रोजी बसवेश्‍वरांना परमात्म्याचे दिव्य दर्शन होऊन अनुग्रहीत झाले. ब्रम्हा, विष्णु,महेशाहुनही सृष्टीकर्ता परमात्मा श्रेष्ठ आहे, ही घोषणा करून त्या परमात्म्याला ‘लिंगदेव’ असे नाव दिले. निराकार देवाला प्राणी, मानव आदिंच्या आकारात पूजा करणे निषेध मानून देवाचे साकार म्हणजेच ब्रम्हांड हे गोलाकार आहे. त्यासाठी लिंगदेवाला विश्‍वाच्या आकारात पूजावे म्हणून इष्टलिंगाची परिकल्पना दिली. इष्टलिंग हे कोणत्याही जाति, वर्ण,वर्गाचे प्रतीक नसून एकूणच मानव समुहाचे गणचिन्ह आहे.

    विश्‍वगुरू बसवेश्‍वरांनी दिव्यानुभव मिळवुन नवसमाज निर्माणाची रूपरेषा मनात धारण करून कल्याणाच्या कार्यक्षेत्रात प्रवेश केला. पुढे आपल्या मामांची मुलगी निलगंगा यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लेखनिक म्हणून कायक सुरू केले. त्यानंतर भंडारी म्हणून व पुढे प्रधानमंत्री म्हणून बिज्जल राजाच्या दरबारी मोठ्या निष्ठेने कार्यभार सांभाळला. कल्याणमध्ये अनुभव मंटपाची स्थापना केली. अनुभव मंटपात परिपूर्ण पीठ म्हणजे ‘शून्यपीठ’ नावाची आध्यात्मिक धर्मपीठाची स्थापना करून प्रथम पीठाधीश म्हणून श्री अल्लमप्रभुदेवांची नेमणूक केली. चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्‍वर हे द्वितीय आणि सोलापुरचे सिध्दरामेश्‍वर हे त्या पीठाचे तृतीय पीठाधीश होते. सर्व जातीतील 770 शरणांच्या माध्यमातून वचनधर्म ग्रंथ देऊन धर्मप्रचार सुरू केला. जगाला भक्ती, कायक, दासोह व समतेचा महत्व पटवून दिले. या सगळ्याद्वारे गुरू बसवेश्‍वरांनी सर्वसामान्यांच्या घरादारापर्यंत धर्मगंगा नेऊन पोहचविली. गुरू बसवेश्‍वरांनी इष्टलिंग धारण करणार्‍या सर्वांना एकसमान मानले. जन्मत: ब्राम्हण असलेले आणि संस्काराने लिंगायत झालेले मधुवरस यांची कन्या लावण्यवती व जन्माने चांभार असलेले आणि संस्काराने लिंगायत झालेले हरळय्या यांचा मुलगा शिलवंत ह्या दोघांचा विवाह घडवून आणण्यास गुरू बसवेश्‍वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यामातून प्रेरित केले म्हणून धर्मगुरू बसवेश्‍वरांना हद्दपारीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेचा स्विकार करून गुरू बसवेश्‍वर कल्याणमधुन बाहेर पडल्यानंतर हरळय्या, मधुवरस आणि शीलवंत यांना बंदिस्त करून प्रतिगामी लोकांनी त्यांचे डोळे काढुन हत्तीच्या पायाला बांधुन ओढत नेण्याची (यळेहूटे) शिक्षा ठोठावली. पुढे धर्मांध लोकांनी वचन साहित्याचा नाश करण्याचा प्रयत्न करीत असताना वीरमाता अक्कनागलंबिका, चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा, वीर गणाचारी मडिवाळ माचिदेव आदीनी युध्द करून वचनसाहित्याचे संरक्षण केले. त्यामुळे आजतागायत ‘वचन साहित्य’ हे विश्‍वाचा अमुल्य ठेवा ठरला आहे. असे हे महान बसवेश्‍वर हे धर्मपिता मंत्रपुरूष लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत. 62 वर्षे, 3 महिने, 2 दिवस सार्थक जीवन जगलेले गुरू बसवेश्‍वर नळनाम संवत्सरातील श्रावण शुध्द पंचमी (दि. 30-7-1196) रोजी लिंगैक्य झाले.

    ReplyDelete