Tuesday, 18 October 2016

दिनविशेष - १९ ऑक्टोबर – २०१६



तिथी
 आश्विन कृष्ण ४ (१९:३३)  
वार
 बुधवार
नक्षत्र
 रोहिणी (२४:०८)
योग
 व्यतीपात (९:५१), वरीयान (३०:१३)
करण
 बव (९:०७), कौलव (३०:०५)


संकष्ट चतुर्थी

पुणे चंद्रोदय: २१:१४
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः '
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला 'अंगारकी संकष्टी ' म्हणतात. हा एक महान योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणार्‍यास वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते. यथाविधी व षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच चतुर्थी तिथीस, चंद्रास आणि श्रीगजाननास अर्घ्यप्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या व्रताच्या प्रभावाने साधकाची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्यास सर्व ऐहिक सुखे प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो, अशी लोकांत श्रद्धा आहे.

करक चतुर्थी

आश्‍विन कृष्ण चतुर्थीला (जी चंद्रोदयव्यापिनी ) हे व्रत करतात. जर चतुर्थी दोन दिवस असेल अगर दोन्ही दिवस नसेल तर 'मातृविद्धा प्रशस्यते' या न्यायाने पूर्वविद्धा मानावी.
या व्रतात शिव-शिवा, कार्तिकस्वामी व चंद्र यांची पूजा करावी. नैवेद्यासाठी गुळ-पापडीचे लाडू वगैरे करवे ठेवावेत. हे व्रत सामान्यपणे लग्न झालेल्या स्त्रिया (सौभाग्यवती) अगर त्याच वर्षी लग्न झालेल्या मुलींनीही करावे. नैवेद्याचे १३ लाडू अगर करवे, १ कापड, १ भांडे, व विशेष लाडू सासूसासर्‍यांना द्यावेत.
हे व्रत करणार्‍यांनी त्या दिवशी आंघोळ इ. नित्यकर्मे पुरी करून
'मम सुखसौभाग्यपुत्रपौत्रादि सुस्थिर श्रीप्राप्तये करकचतुर्थीव्रतमहं करिष्ये ।'
हा संकल्प करुन वाळुवर पिंपळाच्या वृक्षाचे चित्र काढून त्याखाली शिवशिवा (पार्वती) व षडानन यांच्या मुर्ती अगर चित्र यांची स्थापना करून
नम: शिवायै शर्वाण्ये सौभाग्यं संततिं शुभाम् ।
प्रयच्छ भक्तियुक्‍तानां नारीणां हरवल्लभे ।'
या मंत्राने पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.
'नम: शिवाय'षण्मुखाय नम:'
या मंत्रांनी अनुक्रमे शंकर व कार्तिकस्वामी यांची पूजा करून करव्याचा अगर लाडवांचा नैवेद्य दाखवावा. चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन व ब्राह्मणाला दक्षिणा देऊन मग स्वत: जेवावे.

करवा चौथ

भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रांतात लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्य व स्वास्थ्य यासाठी  आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. दिवसभर उपवास करून रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर अन्नग्रहण करावे. हे व्रत १२ किंवा १६ वर्ष करतात. त्यानंतर याचे उद्यापन करता येते. मात्र ज्यांना आजीवन हे व्रत करायचे आहे त्यांनी अखंड हे व्रत करत राहावे. 

दशरथपूजा

आश्‍विन कृष्ण चतुर्थी रोजी दशरथाची पूजा करून तेथेच दुर्गापूजन केल्यास सर्व सुखांचा लाभ होतो.

घबाड

१९:३३ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: चित्रा
चंद्र नक्षत्र : रोहिणी
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment