तिथी
|
आश्विन कृष्ण अमावस्या (२३:०८)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
चित्रा (०९:०२)
|
योग
|
प्रीति (२२:००)
|
करण
|
चतुष्पाद (९:५४)
|
अभ्यंगस्नान
शौचमुखमार्जन
झाल्यावर-
'यमलोकदर्शनाभावकामोऽहमभ्यंगस्नान करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
तिळाच्या तेलापासून केलेले उटणे अंगास लावून अभ्यंगस्नान करावे.
दीपावली
प्रज्वलीत पणत्या
ओळी करून मांडल्या असता त्यांना 'दीपावली' व त्यांची वर्तुळाकार मंडले तयार केल्यास 'दीपमालिका' अशी नावे आहेत. दोन्ही नावांत एकच अर्थ
समाविष्ट आहे. या व्रतेकरून
'आश्विने
मास्यमावास्या तस्यां दीपप्रदीपनं ।
शालायां
ब्राह्मण: कुर्यात् स गच्छेत् परमं पदम् ।'
या श्लोकाधारे
मुक्ती ( परमपद ) मिळते. ब्रह्मपुराणात 'आश्विन महिन्यात अमावस्येस मध्यरात्री देवी लक्ष्मी सर्व
लोकांच्या घराघरात संचार करते' असा उल्लेख आहे.
म्हणून आपली घरे स्वच्छ, सुशोभित व पवित्र
करून दिवे प्रज्वलित केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते व ती त्या घरात कायम वास्तव्य
करते. या खेरीज पावसाळ्यात घाण, केरकचरा, कोळ्यांची जाळी, धूळ, दुर्गंध इ. दूर
करण्याच्या दृष्टीनेही या दिवशी दिव्यांच्या रांगा अगर मंडले प्रज्वलित करावीत, हे आरोग्यदृष्ट्या हितकर होय. प्रदोषकाळापासून
मध्यरात्रीपर्यंत टिकणारी ही तिथी श्रेष्ठ होय. अशी नसल्यास प्रदोषव्यापिनीच
घ्यावी.
लक्ष्मी कुबेर पूजन
लक्ष्मी पूजन मुहूर्त (पुणे शहरानुसार) : १८:५९ ते २१:०० (शुभ व अमृत मुहूर्त
व वृषभ - स्थिर लग्न)
शेतकऱ्यांसाठी
ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारीवर्गासाठी आश्विनातील
अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी
सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून
लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर
यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.
आश्विन
अमावास्येस म्हणजे दिवाळी दिवशी प्रात:स्नानादि नित्यकर्मे झाल्यावर
'मम सर्वापच्छान्तिपूर्वदीर्घायुष्यबलपुष्टिनैरुज्यादि
सकल शुभफलप्राप्त्यर्थं गजतुरगरथराज्यैश्वर्यादि सकलसंपदाम्
उत्तरोत्तराभिवृद्ध्यर्थं इंद्रकुबेरसहित श्रीलक्ष्मीपूजनं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
दिवसभर व्रत पाळावे व संध्याकाळी ( प्रदोषकाळी ) पूर्वोक्त विधींनी पुन्हा स्नान
करून दिवे उजळावेत. दीपावली, दीपमालिका वा
दीपवृक्ष बनवून खजिन्यात अगर कोणत्याही स्वच्छ, सुंदर, सुशोभित व शांत ठिकाणी वेदी तयार करावी. त्यावर
स्वस्तिक काढावे. वेदीवर अगर पाटावर आठ दले अक्षतांनी रेखून त्यावर लक्ष्मीची
स्थापना करावी.
'लक्ष्म्यै नम:', इंद्राय नम;', कुबेराय नम:'
या नावांनी
प्रत्येकास वेगवेगळी अगर सर्वांस मिळून एकत्र पूजा करावी.
'नमस्ते
सर्वदेवानां वरदासि हरे: प्रिया ।
या
गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्वद् अर्चनात् ।'
मंत्राने
लक्ष्मीची;
'ऎरावत समारूढो
वज्रहस्तो महाबल: ।
शतयज्ञाधिपो देवस्तस्मा
इंद्राय ते नम: ।'
मंत्राने
इंद्राची; तसेच
'धनदाय नमस्तुभ्यं
निधिपद्माधिपाय च ।
भवन्तु
त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपद: ।'
या मंत्राने
कुबेराची प्रार्थना करावी. पूजा साहित्यात तर्हेतर्हेची मिठाई व साळीच्या लाह्या, उत्तमोत्तम फळे, फुले व सुगंधित धूपदीपादी उपचार असावेत.
संपूर्ण दिवस ब्रह्मचर्यात राहून उपवास वा नक्त-व्रत करावे.
लक्ष्मीपूजनात
लेखसाहित्यात पुढील वर्षाच्या जमाखर्चाच्या वह्या मांडून पूजा करण्याचा प्रघात
व्यापारी व सावकार यांच्यात आहे व लक्ष्मी- पूजनानंतर शुभ्रवस्त्रे व अलंकार धारण
करून ब्राह्मण, आप्तइष्टांसह
भोजन करावे. रात्री घरात व घराभोवती दिवे लावून जागरण करावे. अर्धी रात्र
उलटल्यावर स्त्रियांनी सुपे व ढोलकी वाजवून आपल्या घरातल्या अलक्ष्मीची हकालपट्टी
करावी. पहाटे दिव्याच्या प्रकाशात भावांनी व आप्तेष्टांनी एकमेकांचे क्षेमकुशल
विचारावे.
फल - लक्ष्मीपूजन केल्याने पूजकाच्या घरी लक्ष्मी
सदैव वास करते आणि त्याला दु:ख व दारिद्र्यबाधा होत नाही.
या दिवशी रात्री
बळीच्या कारागृहातून विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांची मुक्तता केली व तो
क्षीरसागरात जाऊन सुखाने झोपला.
अलक्ष्मी (लक्ष्मी नव्हे ती) निस्सारण
या देवीचे वर्णन
आगम व विष्णुपुराण यांत आढळते. ती कृष्णवर्ण, रक्तनेत्र; द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते.
केरसुणी हे तिचे आयुध होय. शीतलादेवीचे स्वरूपही काही अंशी अलक्ष्मीसारखेच आहे. या
वर्णनाशी जुळणार्या काही मध्ययुगीन शिल्पकृती.
हिचा फेरा आपल्या
घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी आश्विन शुद्ध अष्टमीस महालक्ष्मीच्या पूजेआधी
ज्येष्ठा या नावाने हिची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन करतात. ही घरातून निघून
जावी म्हणून काही ठिकाणी मागील दारी एक वात लावून ती घराच्या कोनाकोपर्यात फिरवून
पुढील दारी आणुन टाकतात. हा प्रकार म्हणजे अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखविणे होय.
याच्याउलट बाहेर वात लावून ती घरात आणणे म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग
दाखविणे, असे समजतात. बंगालमध्ये
आश्विनी अमावस्येस शेणाची 'क्षणिका अलक्ष्मी' बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग
तिचे विसर्जन करतात.
[चतुर्दशीपासून
तीन दिवसांना दीपावली (दिवाळी) असे नाव आहे. या तिहीत जो दिवस स्वातीनक्षत्राच्या
योगाचा असेल तोच उत्तम होय. याच अमावास्येला मध्यरात्रीनंतर गावांतल्या बायकांनी
अलक्ष्मीला (अकाबाईला) आपल्या अंगणातून बाहेर हाकून द्यावी.]
उल्कादर्शन
खरंतर संपूर्ण वर्षभरात
अधूनमधून उल्कावर्षाव होत असतो. पण असे मानले जाते कि या दिवाळीच्या या
दिवसांमध्ये उल्कापात होतो. हे अगदीच नाकारता मात्र येणार नाही. यंदा २१ ऑक्टोबर
रोजी Orionids, १६-१७ नोव्हेंबर रोजी Leonids तर १३-१४ डिसेंबरला
Geminids हा उल्कावर्षाव
आकाशात पाहायला मिळेल. मागीलवर्षी ११ आणि
१२ नोव्हेंबर रोजी North Taurids
नावाचा उल्कावर्षाव होणार आहे. मागील वर्षी म्हणजे २०१४ मध्ये ला Orionids हा उल्कावर्षाव दिवाळीच्या कळत
पाहायला मिळाला होता. याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शाली नाही. अजून थोडे
संधोधन होणे आवश्यक वाटते.
या बाबतीत अजून एक मान्यता
अशी आहे कि, या वेळी महालय समाप्तीचा काळ असतो. तेव्हा महालायात आलेल्या पितरांचा
परतीचा प्रवास सुरु झालेला असतो. त्यासाठी त्यांच्या मार्गात आपण दिवा लावावा.
म्हणजे एखाद्या मोठ्या काठी अथवा बांबूच्या टोकाला चिंधी बांधून त्याची मशाल
करावी. ती पेटवून उंच आकाशात धरून ठेवावी.
दर्श अमावास्या
अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक
फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
आश्विन अमावस्या
यादिवशी स्नान
वगैरे झाल्यानंतर देव, पितृ व पूज्य
लोकांची पूज करून दूध, दही, तूप इ. ने श्राद्ध करावे. अपरान्हवेळी आपल्या
गल्लीतील घरे स्वच्छ करवून घेऊन सुशोभित करावीत व विविध प्रकारचे गायन-वादन, नर्तन-कीर्तन इ. करून प्रदोषकाळी दिवाळी करून
आप्तजन व संबंधितांसह मध्यरात्री निरीक्षण करावे. नंतर रात्रीच्या राहिल्या भागात
जागरण करून सूप व डमरू जोराने वाजवून अलक्ष्मीला ( दरिद्रतेला ) हाकलावे.
कौमुदी महोत्सव
वर वर्णन
केलेल्या पद्धतीने मानसिक व शारीरिक दृष्ट्या ठाकठईक असताना दिवे प्रज्वलित करणे
यासच हे नाव आहे. बलिपुराणानुसार व. एकादशी ते अमावस्येपर्यंत हे व्रत करतात.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
महावीर निर्वाण दिन
दिवाळीच्या दिवशी
भगवान महावीर यांचा निर्वाण दिन साजरा केला जातो.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment