Thursday, 27 October 2016

दिनविशेष - २८ ऑक्टोबर – २०१६




तिथी
 आश्विन कृष्ण १३ (१८:२१)  
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 हस्त (३०:१०)
योग
 वैधृति (२०:२५)
करण
 विष्टि (--:--)

धनत्रयोदशी

आश्‍विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसूफ करतात व पुनश्‍च योग्य ठिकाणी ठेवतात, कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात, यथाशक्‍ती दान करतात.
या दिवशी सायंकाळी तेलाने भरून एक दिवा प्रज्वलित करावा व नंतर त्याची गंधादी उपचारांनी पूजा करून घराच्या दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवतात. हा दिवा रात्रभर जळत राहणे आवश्यक आहे.

यमदीपदान

आश्‍विन कृष्ण त्रयोदशीला संध्याकाळी कणकेच्या / मातीच्या दिव्यांत (पणत्यांत) तेल, वात घालून प्रज्वलित करावेत. त्यांची गंधादी उपचारांनी पूजा करावी. मग दक्षिणेकडे तोंड करून -
'मृत्युना दंडपाशाभ्यां कालेन श्यामया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सुर्यज: प्रीयतां मम ।'
असा मंत्र म्हणून हे दिवादान दिल्यास यम प्रसन्न होतो. ही प्रदोषव्यापिनी त्रयोदशी शुभ असून ही मात्र दोन दिवस असेल अगर दोन्ही दिवस नसेल तर तिसर्‍या दिवशी करावी.

गोत्रिरात्र

आश्‍विन कृष्ण त्रयोदशीपासून दिवाळीच्या दिवसापर्यंत हे व्रत केले जाते. यात उदयव्यापिनी तिथी घेतली जात असून दोन दिवस ती असेल तर पहिल्या दिवशी मानतात. या व्रतामध्ये गोठा अगर गाईच्या येण्या-जाण्याचा मार्ग यांपैकी एका सोयिस्कर ठिकाणी ८ फूट लांब व ४ फूट रुंद यज्ञवेदी तयार करून 'सर्वतोभद्र' असे लिहावे. त्यावर छत्राकार वृक्ष काढून फळे, त्यावर फूले व पक्षी काढावेत. झाडाशेजारी मंडळाच्या मध्यभागी गोवर्धनधारी श्रीकृष्ण, डाव्या बाजूस रुक्मिणी, मित्तविंदा, शैल्या, जांबवती; उजव्या बाजूस सत्यभामा, लक्ष्मणा, सुदेवा, नाग्नजिती; त्याच्याच पुढील भागात नंद; मागील भागात बलराम व यशोदा; तसेच, कृष्णासमोरच्या भागात सुरभी, सुनंदा, सुभद्रा, व कामधेनू यांच्या सुवर्णमूर्ती स्थापव्यात. प्रत्येकाची पूजा ज्या त्या नाममंत्राने उदा.
'गोवर्धनाय नम:' ने करावी.
'गवामाघार गोविंद रुक्मिणीवल्लभ प्रभो ।
गोपगोपीसमोपेत गृहाणार्घ्यं नमोऽस्तु ते ।'
या मंत्राने कृष्णास व
'रुद्राणां चैव या माता वसूनां दुहिता च या ।
आदित्यानां च भगिनी सा न: शान्ति प्रयच्छन्तु ।
या मंत्राने गाईस अर्घ्य द्यावे. मग
'सुरभी वैष्णवी माता नित्यं विष्णुपदे स्थिता ।
प्रतिगृह् णाति मे ग्रासं सुरभी मे प्रसीदतु ।'
या मंत्राने गाईस नैवेद्य दाखवावा. विविध फळे, फुले इ. नी पूजा करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून टोपल्यांतून सात धान्ये व सात पक्वान्ने सुवासिनींना द्यावीत. अशाप्रकारे तीन दिवस व्रत करून चौथ्या दिवशी सकाळी आंघोळ नंतर गायत्री मंत्राने १०८ तिळांची आहुती द्यावी व उद्यापन करावे. यामुळे सुत, सुख व संपत्ती यांचा लाभ होतो.

धन्वन्तरी जन्मोत्सव

आश्‍विन कृष्ण त्रयोदशी या दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वन्तरी याचा उत्सव वैद्यकाची प्रगती होण्याकरिता वैद्य लोक करतात. हा देवांचा वैद्य व विष्णूचा एक अवतार मानतात.
दुर्वासाने इंद्रास शाप देऊन वैभवहीन केले. तेव्हा ते पुनरपी मिळविण्याच्या हेतूने देव-दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून चौदा रत्‍ने निघाली. त्यांत सुधर्मात्मा व आयुर्वेदमय दंडकमंडलूसहित असा धन्वन्तरी हातात अमृतकलश घेऊन बाहेर पडला. हा विष्णुचा अवतार असून सर्व वेदांत निष्णात व मंत्रतंत्रातही विशारद होता. याला आदिदेव, अमरवर, अमृतयोनी, सुधापाणी, अब्ज इ, अन्य नावेही आहेत.
याच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झाले. ते जरामृत्युरहित बनले. त्यामुळे त्याला देवांचे वैद्यराजपद लाभले. भागवत पुराणात विष्णूच्या चोवीस अवतारांत धन्वन्तरीचा समावेश केला आहे. विष्णुच्या अवताराची प्रतिष्ठा लाभल्यामुळे वैष्णवमूर्ती-समुदायात धन्वन्तरीच्या मूर्तीला स्थान मिळाले. याच्या प्राप्तीसाठी ईशान्य दिशेकडे मुख करून सायं-प्रार्थना करावी. धन्वन्तरीने चिकित्सेचे ज्ञान भास्करापासून प्राप्त केले आणि भास्कराच्या आयुर्वेद्संहितेच्या आधारे 'चिकित्सा तत्त्वविज्ञान' नामक ग्रंथ रचला. तेव्हापासून आयुर्वेदाचा प्रसार सुरू झाला -
फल - आरोग्य व दीर्घायुष्य.

प्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये'

 इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.

भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥

भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
 या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी.  

ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !! "
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे  कायमचे नाहिशे होवोत.)

हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 
Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

भद्रा

१८:२१ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष माणू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment