Friday, 28 October 2016

दिनविशेष - २९ ऑक्टोबर – २०१६




तिथी
 आश्विन कृष्ण १४ (२०:४०)  
वार
 शनिवार
नक्षत्र
 चित्रा (अहोरात्र)
योग
 विष्कंभ (२१:०९)
करण
 विष्टि (७:२९)

अभ्यंगस्नान

चंद्रोदयी पहाटे ५:१४
आश्‍विन कृष्ण चतुर्दशीला पहाटे, ज्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्दशी असेल त्या दिवशी सकाळी, शौचमुखमार्जन झाल्यावर-
'यमलोकदर्शनाभावकामोऽहमभ्यंगस्नान करिष्ये ।'
असा संकल्प सोडून तिळाच्या तेलापासून केलेले उटणे अंगास लावावे. मग नांगरलेल्या जमिनीतील ढेकूळ, तुंबी व आघाडा डोक्याभोवती अनेक वेळा फिरवून स्वच्छ स्नान करावे. जरी कार्तिक-स्नानात तेलाने अभ्यंग वर्ज्य असले तरी
'नरकस्य चतुर्दश्यां तैलाभ्यंगं च कारयेत् ।
अन्यत्र कार्तिकस्नायी तैलाभ्यंगं विवर्जयेत् ।'
याअनुसार नरकचतुर्दशीस तेलाने अभ्यंग स्नान करण्यात कोणताही दोष नाही. जर ही तिथी दोन्ही दिवस चंद्रोदयव्यापिनी असेल तर चतुर्दशीला चौथ्या प्रहरी आंघोळ करावी. चार दिवस हे व्रत केल्याने सुखसौभाग्य वाढते.

नरक चतुर्दशी

 या चतुर्दशीस 'रूपचतुर्दशी' असेही म्हणतात.
नरकासुराने सोळा हजार स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासुर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
या दिवशी चार वातींची समई प्रज्वलित करून पूर्वेकडे तोंड करून ती
'दन्तो दीपश्‍चतुर्दश्यां नरकप्रीतये मया ।
चतुर्वर्ति समायुक्‍त: सर्वपापान् अनुत्तये ।'
हा मंत्र म्हणून दान द्यावी. यावेळी एक प्रज्वलित उल्का (दारूसामानाची बनलेली ) घेऊन
'अग्निदग्धाश्‍च ये जीवा ये ऽ प्यदग्धा: कुले मम ।
उज्जवल ज्योतिषादग्धास्ते यान्तु परमां गतिम् ।'
या मंत्राने तिचे दान केले तर उल्का इ. मुळे मेलेले सद्‌गतीप्रत जातात.
हे एक काम्य व्रत आहे. या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान झाल्यावर सर्व आन्हिके आटोपून झाल्यावर नक्‍त व्रताचा संकल्प करतात. सायंकाळी नरकासुराच्या नावाने चार वातींचा दिवा लावून पुढील मंत्र म्हणातात -
'अग्निर्ज्योती रविर्ज्योतिश्‍चद्रोज्योतिस्तथैव ।
सर्वेषां ज्योतिषां श्रेष्ठी दीपोऽयं प्रतिगृह्यताम्‌।'
असे म्हणून देवालये, वाडा, उद्याने वगैरे सर्वत्र दिवे लावतात. नंतर गवताची अगर अन्य कशाची चूड पेटवून '
अग्निदग्धाश्च ये जीवा येऽप्यदग्धाः कुले मम।
उज्ज्वलज्योतिषा दग्धास्ते यान्तु परमाङ्गतिम्‌॥'

हा मंत्र म्हणतात. अग्नीने दग्ध होऊन जे मरण पावले असतील, मेल्यावर दग्ध झाले नसतील तेसुद्धा सर्व या चुडीचा प्रकाशामुळे परमगती पावतात.
शेवटी शैव ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देऊन व्रतकर्त्याने स्वत: उडदाच्या पानांच्या भाजीने युक्‍त असे नक्‍त भोजन करावे, असे सांगितले आहे.

यमतर्पण

आश्‍विन कृष्ण चतुदशीला सायंकाळी अपमृत्यू होऊ नये म्हणून पिता असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व इतरांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी यमतर्पण करावे.
यमंतर्पयामि |
धर्मराजं तर्पयामि |
मृत्युं तर्पयामि |
अंतकं तर्पयामि |
वैवस्वतं तर्पयामि |
कालं तर्पयामि |
सर्वभूतक्षयकरं तर्पयामि |
औदुम्बरं तर्पयामि |
दध्नं तर्पयामि |
नीलं तर्पयामि |
परमेष्ठिनं तर्पयामि |
वृकोदरं तर्पयामि |
चित्रं तर्पयामि |
चित्रगुप्तं तर्पयामि |
  
नतर दक्षिणेकडे तोंड करून पाणी, दर्भ व तीळ हातात घेऊन पुधिल् श्लोक १० वेळा म्हणावा.
यमेनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च काल: |
भूताधिपो दत्त कृतानुसारी एतद्द्शभिर्जपंति ||

जानवे गळ्यात मालाकार ठेवून तर्पण करताना काळे व पांढरे दोन्ही तीळ वापरावे. कारण यमामध्ये धर्मराजरूपी देवत्व व यमराजरूपी पितृत्व हे दोन्ही अंश असतात.

उल्कादर्शन

खरंतर संपूर्ण वर्षभरात अधूनमधून उल्कावर्षाव होत असतो. पण असे मानले जाते कि या दिवाळीच्या या दिवसांमध्ये उल्कापात होतो. हे अगदीच नाकारता मात्र येणार नाही. यंदा २१ ऑक्टोबर रोजी Orionids, १६-१७ नोव्हेंबर रोजी Leonids तर १३-१४ डिसेंबरला Geminids  हा उल्कावर्षाव आकाशात पाहायला मिळेल. मागीलवर्षी  ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी North Taurids नावाचा उल्कावर्षाव होणार आहे. मागील वर्षी म्हणजे २०१४ मध्ये ला  Orionids हा उल्कावर्षाव दिवाळीच्या कळत पाहायला मिळाला होता. याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शाली नाही. अजून थोडे संधोधन होणे आवश्यक वाटते.

या बाबतीत अजून एक मान्यता अशी आहे कि, या वेळी महालय समाप्तीचा काळ असतो. तेव्हा महालायात आलेल्या पितरांचा परतीचा प्रवास सुरु झालेला असतो. त्यासाठी त्यांच्या मार्गात आपण दिवा लावावा. म्हणजे एखाद्या मोठ्या काठी अथवा बांबूच्या टोकाला चिंधी बांधून त्याची मशाल करावी. ती पेटवून उंच आकाशात धरून ठेवावी.

कुलधर्म



दीपदान

आश्‍विन कृष्ण चतुर्दशी दिवशी प्रदोषकाळी तिळाच्या तेलाने भरलेले आणि प्रज्वलित असे १४ पूजित दिवे घेऊन
'यममार्गांधकारनिवारणार्थे चतुर्दशदीपानां दानं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून ब्रह्मा, विष्णू व महेश इ. देवतांच्या देवळांत, सभामंडपात, गाभार्‍यात, आवारात आणि बागा, गल्ल्या, विहिरी यांच्या आसमंतात, तसेच तबेला व अन्य एकान्त ठिकाणी दिवे उजळावेत. या
'दिव्यां' च्या व्रताने यमराज प्रसन्न होतो.

हनुमज्जयंत्युत्सव

'आश्‍विनस्यासिते पक्षे भूतायां च महानिशि ।
भौमवारेऽञ्जनादेवी हनुमंतं अजीजनत् ।'
आश्‍विन कृष्ण चतुर्दशीला भौमवारी मध्यरात्री अंजनीने हनुमानास जन्म दिला. मारुती-उपासकांनी या दिवशी प्रात:स्नानादी करून
'मम शौर्यादार्यधैर्यादिवृद्धर्थं हनुमत् प्रीतिकामनया हनुमज्जयंतिमहोत्सवं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून मारुतीची षोडशोपचारे पूजा करावी. तेल व गंध यात शेंदूर खलून तो मूर्तीला लावावा. त्यास फूले वाहावीत. नैवेद्यासाठी तूप घातलेला चुर्मा, मोदक, केळी, पेरू इ. फळे ठेवावीत. वाल्मीकी रामायणातील 'सुंदरकांड' वाचावे. रात्री दिवाळीसारखी दिव्यांची शोभा करावी. चैत्र शुद्ध पौर्णिमेलाही काही शास्त्रानुसार हनुमानजयंतीचा उत्सव करतात, म्हणून चैत्रातील व्रतांत या व्रताचा समावेश दिसुन येतो. आश्‍विन व. चतुर्दशीला हनुमानजयंती करतात.

भद्रा

७:२९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष माणू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment