Monday, 10 October 2016

विजयादशमी (दसरा)



शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन

आश्‍विन शुक्ल दशमील श्रवण-नक्षत्रयोग असता विजयादशमी असते. या दिवशी राज्यवृद्धीच्या भावनेने आणि विजयप्राप्तीच्या आकांक्षेने राजेलोक 'विजयकाली' प्रस्थान करतात. 'ज्योतिर्निबंध' ग्रंथात लिहिले आहे की,
'आश्‍विनस्य सिते पक्षे दशम्यां तारकोदये
स कालो विजयो ज्ञेय: सर्वकार्यार्थ सिद्धये ॥'
आश्‍विन शुक्ल दशमीला संध्याकाळी तारकोदयाचा समय हा 'विजयकाल' होय. या वेळी केलेली सर्व कार्ये सिद्धी पावतात. आश्‍विन शुक्ल दशमी पूर्वविद्ध निषिद्ध, परविद्धा शुद्ध आणि श्रवणयुक्त सूर्योदयव्यापिनी सर्वश्रेष्ठ होय. राजेलोकांनी या दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे उरकून
'मम क्षेमारोग्यादिसिद्धयर्थं यात्रायां विजयसिद्धयर्थं गणपतिमातृकामार्गदेवता परजिताशमीपूजनानि करिष्ये ।'
असा संकल्प करून उपर्युक्त सर्व देवता, अस्त्रशस्त्र-अश्‍वादी, तसेच पूजनीय गुरुजन, इत्यादींची यथाविधी पूजा करावी आणि उत्तमतर्‍हेने सजवलेल्या घोड्यावर आरूढ होऊन अपराण्हसमयी गज, तुरंग, रथ राज्यैश्‍वर्य इत्यादिसहित स्वारीस निघावे. आपल्या नगराच्या बाहेर ईशान्य कोपर्‍यात शमी आणि अश्‍मन्तक (आपटा) वृक्षाच्या समीप घोड्यावरून उतरावे. शमीच्या बुंध्याजवळच्या भूमीवर प्रोक्षण करावे आणि पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून प्रथम शमीवृक्षाचे, नंतर अश्‍मंतक वृक्षाचे पूजन करावे. नंतर
'शमी शमय मे पापं शमी लोहितकंटका ।
धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवांदिनी ॥
करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मम ।
तत्र निर्विघ्नकर्ती त्वं भव श्रीरामपूजिते ॥'
या मंत्राने शमीची प्रार्थना करावी आणि
'अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारक ।
इष्टानां दर्शन देहि शत्रूणां च विनाशनम् ।'
अशा मंत्राने अश्‍मन्तकाची प्रार्थना करावी. नंतर शमीची किंवा अश्‍मन्तकाची किंवा दोहोंची पाने घेऊन त्यात पूजास्थानची थोडीशी माती आणि थोडे तांदूळ व एक सुपारी ठेवून कपड्यात बांधून घ्यावी आणि कार्यसिद्धीच्या कामनेने स्वत:पाशी ठेवावी. नंतर आचार्यादिकांचे आशीर्वाद घेऊन तेथेच पूर्वदिशेला विष्णूला प्रदक्षिणा करून आपल्या शत्रूचे स्वरूप ह्रदयामध्ये आणि त्याची प्रतिकृती डॊळ्यात उभी करून तोफ, बंदूक किंवा सुवर्णशर याने त्याच्या ह्रदयाच्या मर्मस्थलाचा भेद करावा अणि हाती खड्‌ग घेऊन दक्षिण दिशेला आरंभ करून वृक्षानजीकच्या चारी दिशांना भ्रमण करून विजय प्राप्त करावा आणि 'शत्रूला जिंकले आहे' असे म्हणावे. यानंतर नगराकडे पूर्ववत परतावे आणि प्रवेशद्वारी आरती करून निवास करावा.

No comments:

Post a Comment