तिथी
|
आश्विन शु १ (अहोरात्र)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
चित्रा (२८:३८)
|
योग
|
वैधृति (२३:१६)
|
करण
|
किंस्तुग्घ (१८:५१)
|
नवरात्रारंभ
आश्विन शु प्रतिपदेपासून
नवमीपर्यंत देवीचे नवरात्र साजरे करतात. नवरात्र म्हणजे नऊ दिवस किंवा नऊ माळा अशी
समजूत आहे. क्वचित आठ किंवा दहा दिवस येतात. नऊ दिवस व रात्रीचा कुळाचार म्हणजे नवरात्र असा या शब्दाचा
अर्थ नाही तर आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म (घट
स्थापना नंदादीप इ) म्हणजे नवरात्र असा नवरात्र शब्दाचा अर्थ धर्मसिंधुकारांनी
दिला आहे. म्हणून त्यात किती दिवस (८/९/१०) असा प्रश्न नाही.
सप्तशतीची पारायणे
नवरात्रामध्ये अनेक जणांचे
घरी नवरात्र सुरु झाल्यापासून उठे पर्यंत उठेपर्यंत उपोषण असते. असे उपोषण महानवमीच्या
दिवशी सकाळी नवरात्रोत्थापन होईपर्यंतच करावे. त्यानंतर महानवमीच्याच दिवशी
उपोषणाचे पारणे करावे.
·
देवीच्या
नवरात्रात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची पूजा अणि
सप्तशतीचा पाठ या गोष्टींना प्राधान्य आहे. पाठ करायचा असेल तर पाठ्यपुस्तक
देवतातुल्य मानून त्याचे पूजन करावे. १, ३, ५ अशा विषम संख्यात्मक सप्तशतीची पारायणे करावी. पाठासाठी
विशेष ब्राह्मण निमंत्रित करणे असतील तर त्यांची संख्याही १, ३, ५ अशी विषम असावी. सप्तशतीचे पाठ
(पारायणसंख्या) आपल्या उद्दिष्टाच्या स्वरूपानुसार पुढीलप्रमाणे करावे.
·
फलसिद्धी १,
·
उपद्रव-शांतीसाठी
३,
·
सामान्यत: सर्व
प्रकाराच्या शांतीसाठी ५,
·
भयमुक्तीसाठी ७,
·
यज्ञ-फलाच्या
प्राप्तीसाठी ९,
·
राज्यप्राप्तीसाठी
११,
·
कार्यसिद्धीसाठी
१२,
·
एखाद्याला वश
करण्यासाठी १४,
·
सुखसंपत्तीच्या
प्राप्तीसाठी १५,
·
धनपुत्रप्राप्तीसाठी
१६,
·
शत्रू, रोग आणि राजा यापासूनच्या भयनिवारणासाठी १७,
·
प्रियप्राप्तीसाठी
१८,
·
अनिष्ट
ग्रहांच्या दोष निवारणासाठी २०,
·
बंधमुक्तीसाठी
२५,
·
आणि मृत्युभय, व्यापक उपद्रव, तसेच देशविनाश
इत्यादीपासून बचाव व्हावा आणि असाध्य गोष्टीच्या सिद्धीस्तव, तसेच लोकोत्तर लाभास्तव, आवश्यकतेनुसार
१००; १०००; दहाहजार, व एक लाखपर्यंत सप्तशतीपाठ करावे.
कुमारीपूजन
देवीव्रतांमध्ये 'कुमारीपूजन' परमावश्यक मानले गेले आहे. शक्य तर नवरात्र
संपेपर्यंत, नाही तर समाप्तीच्या दिवशी कुमारीचे पाय धुऊन
तिची गंधपुष्पादींनी पूजा करावी. तिला मिष्टान्न भोजन वाढावे.
* एका कुमारिकेचे
पूजन केले असता ऎश्वर्यप्राप्ती होते;
* दोघींचे पूजन
केले असता भोग व मोक्षप्राप्ती होते;
* तिघींचे पूजन
केल्याने धर्म-अर्थ-काम यांची प्राप्ती होते;
* चौघींच्या
पूजनाने राज्यपदप्राप्ती;
* पाच जणींचे
पूजन केल्याने विद्याप्राप्ती;
* सहांच्या
पूजनाने षट्कर्मसिद्धी;
* सातांच्या
पूजनाने राज्यप्राप्ती;
* आठजणींच्या
पूजेने संपत्ती आणि
* नऊ कुमारींची
पूजा केली असता पृथ्वीचे राज्य मिळते.
दोन वर्षांची
मुलगी कुमारी,
तीन वर्षांची
त्रिमूर्तिनी,
चार वर्षांची
कल्याणी,
पाच वर्षांची
रोहिणी,
सहा वर्षांची
काली,
सात वर्षांची चण्डिका,
आठ वर्षांची
शांभवी,
नऊ वर्षांची
दुर्गा आणि
दहा वर्षांची
सुभद्रा-स्वरूपिणी संबोधिली जाते.
कुमारीपूजनासाठी
याहून मोठी मुलगी अग्राह्य होय. दूर्गापूजेमध्ये प्रतिपदेला केसांना लावण्याची
द्रव्ये-आवळा, सुगंधी तेल, इ. वहावीत, द्वितीयेला केस बांधण्यासाठी रेशमी दोरा वहावा, तृतीयेला सिंदूर व आरसा अर्पण करावा, चतुर्थीला मधुपर्क, तिलक आणि
नेत्रांजन, पंचमीला उटणे, चंदनादी अंगराग व
अलंकार आणि षष्ठीला फुले अर्पण करावीत. सप्तमीला गृहमध्यपूजा, अष्टमीला उपवासपूर्वक पूजन, नवमीला महापूजा व
कुमारीपूजन आणि दशमीला आरती आणि विसर्जन करावे.
याचप्रमाणे
रामकृष्णादींच्या नवरात्रमहोत्सवात स्तोत्रपाठ किंवा लीलाप्रदर्शनाचा कार्यक्रम
करावा. हा सर्व उल्लेख केवळ दिग्दर्शनात्मक आहे. तरी विशेष गोष्टींची माहिती अन्य
ग्रंथांमधून अवगत करून घ्यावी. याप्रमाणे नऊ दिवसपर्यंत नवरात्रव्रत करून दहाव्या
दिवशी दशांश हवन, ब्राह्मणभोजन आणि व्रतोद्यापन ( विसर्जन )
करावे.
घटस्थापना
वेदिका म्हणजे शेत. शेतीतील
काळी माती आणूनएका पत्रावळीवर बोटाचे उभे पेर उंचीचा व वीतभर लांबरूंदीचा सपाट ढीग
करून एक मूठभर धान्य त्यात पेरावे. हे धान्य हळदिच्या पाण्यात रंगवून घ्यावे.
यामध्ये सप्त धान्य येतात. ( तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग) पत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्यामध्ये ‘वेदिकायैनमः’ म्हणून गंधफूल वाहून पूजा करावी. ‘सप्तधान्येभ्योनमः’ असे म्हणून त्या शेतात
तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग ही धान्ये पेरावी
‘ पर्जन्यायनमः’ म्हणून त्यावर पाणी शिंपडावे. नंतर त्यावर वरूण देवतेची स्थापना करावी. काही
जण वरूण ( कलश ) मातीचा किंवा तांब्याचा ठेवतात. त्यावर काहीजण नारळ ठेवतात. तर
काही जण ताम्हण ठेवून उपास्य देवतेची स्थापना करतात. नंतर दिपाची प्राणप्रतिष्ठा
करावी लागते. कारण शक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे. त्यासाठी जडधातूची समई किंवा नंदादीप
वापरावा.
भोदीप देवी रुपस्त्वं
कर्मसाक्ष ह्यविघ्नकृत |
यावन्नवरात्रसामप्ति:
स्थात्तावत्वं सुस्थिरोभव ||
अशी प्रार्थना करून दीप
लावावा.
विड्याच्या पानावर
कुंकूवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ
देवाकडे ठेवावे. नवरात्रात इतर देवतांची षोडशोपचार पूजा करावी. टाक जागेवरून न
हलविता फुलाने पाणी शिंपडावे व उपचार करावेत. सकाळ संध्यकाळ आरती करावी. देवीची
स्तोत्रे, आरती, जोगवा म्हणावेत. ललिता सहस्त्रनाम, सौंदर्य लहरी, देवी अथर्वशिर्ष इत्यादी जे
शक्य होईल त्याचे पठण करावे. उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात.
आनंदी वातावरण निर्माण होते व देवीचे सतत स्तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते.
मातामह श्राद्ध
नवरात्रच्या
पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र) असते.
ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील) जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहीत्राचा
अधिकार असतो. आजोबा (आईचे वडील) गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात
करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहीत्राचा अधिकार नातवास तिसऱ्या
वर्षापासून येतो.
इष्टी
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
अश्वपूजा
ज्यांच्या घरी
घोडे असतील, त्यांनी आश्विन शु. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत
रोज अश्वपूजा करावी, असे सांगितले आहे. त्याचे विधान असे - शांती व
स्वस्त्यन करणे; धणे, बिब्बे, कोष्टकोळींजन, वेखंड व मोहर्या यांची
पुरचुंडी करून घोड्याच्या गळ्यात बांधणे; वायू, वरुण, सूर्य, विष्णू, विश्वेदेव व अग्नी
यांच्या मंत्रांनी हवन करणे;
अशोक व्रत किंवा अशोका प्रतिपदा
हे व्रत
स्त्रियांसाठी आहे. आश्विन शु. प्रतिपदेला नव्याने पल्लवित झालेल्या (नव्याने
पालवी फुटलेल्या) अशोकवृक्षापाशी सप्तधान्ये, गव्हाच्या
लोंब्या, मोदक, डाळिंबादी ऋतुकालोद्भव
फलपुष्प ठेवून (अर्पण करून) यथाविधी पूजन करावे, आणि 'अशोक शमनोभव सर्वत्र न-कुले' असे म्हणून अर्घ्य
द्यावे. बुंध्याशी उत्तम वस्त्रे गुंडाळावीत, पताका लावाव्या.
असे केले असता व्रत करणार्या स्त्रिच्या सर्व दु:खांचे निवारण होते. जनककन्या सीता
हिने लंकेमध्ये असता अशोकवाटिकेमध्ये हे व्रत केले होते आणि त्यामुळे तिचे
शोकनिवारण झाले होते.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
दुर्गेची नऊ रुपे
ReplyDelete-----------------------
1) शैलपुत्री :
दुर्गेचे पहिले रूप ' शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात
होते.
या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता. एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर
नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले
तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी
जाण्याची परवानगी दिली. सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण
तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले. आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला.
सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला
होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.
नवरात्र महात्म्य :
ReplyDelete===============
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरवात होते. नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीचं नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात.आश्विन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यातदेखील देवीचं नवरात्र असून ते चैत्रीपौर्णिमेपर्यंत असतं. आश्विनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते.
ही तेजस्वरूपाची, शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात.या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. या नऊ दिवसांतील पहिले तीन दिवस महाकालीचे पूजन,नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे पूजन आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीचे पूजन केले जाते.नवरात्रीदरम्यान श्री दुर्गासप्तशती पाठ, कुंजिका स्तोत्र पठण, कुमारी पूजन, श्रीसुक्तपाठ भजन आदि कार्यक्रम केले जातात.
नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं म्हणतात;परंतु आश्चिन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करावयाचे पूजन म्हणजे नवरात्र. म्हणून त्याचे दिवस नक्की किती येतात हा प्रश्न नसतो. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं आपण बोलतो.
श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रूपं आहेत.आदिशक्तीची उपासना मुख्य आहे. परंतु ज्या-ज्या रूपात, ज्या-ज्या ठिकाणी, ती प्रगट झाली त्या-त्या रूपात त्या-त्या ठिकाणी तिची पूजा केली जाते. चंद्रिका,भगवती, दुर्गा, शर्वी, त्रिपुरा, भुवनेश्वरी, श्यामा, ललिता,चंडी, चामुंडा, शांतादुर्गा इ. नावांनी या त्रिशक्ती प्रसिद्ध आहेत.
बंगालमध्ये दुर्गा आणि कालिमाता विशेष प्रसिद्ध आहे.तिथे दुर्गाउत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. या दुर्गादेवीचे नऊ अवतार मानले जातात.
1) शैलपुत्री,
2) ब्रह्मचारिणी,
3) चंद्रघटा,
4) कुष्मांडा,
5) स्कंदमाता,
6) कात्यायनी,
7) कालरात्री,
8) महागौरी,
9) सिद्धीदात्री.
या नऊ अवतारांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हणतात. या नवदुर्गेची अनेक कुटुंबांत पूजा केली जाते.
'पुत्रान देही, धनं देही, देही सर्व कामांश्च देही में।
रूपं देही जयं देही यशो देही द्विषो देही।। '
हा दुर्गादेवीचा आधारभूत मंत्र मानला जातो.
-क्रमशः
नवरात्र महात्म्य - २
ReplyDelete===============
नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला स्वत:चे असे महत्त्व असते. पहिला दिवस घटस्थापना, पंचमीला ललितापंचमी म्हणतात. या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते. या देवीचे स्तोत्र श्रीमंत आदि शंकराचार्यांनी रचले आहे. अष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी, विशेषत:देवीक्षेत्रात चंडीहोम करतात.
काही कुटुंबांमध्ये अष्टमीला घरीदेखील होम करतात,तसेच देवीसमोर घागरी फुंकणे हादेखील एक पूजाविधी घरी किंवा देवी मंदिरात सामूहिकरीत्या केला जातो. या पूजेला तांदळाच्या पिठीची उकड घेऊन देवीचा मुखवटा तयार करतात. तिची साग्रसंगीत पूजा करतात. या वेळी देवीची भजनं, गोंधळगीतं, स्तवनं म्हणत महिला घागरी फुंकतात. उत्तररात्रीपर्यंत जागरण करतात. नवमीपर्यंत विविध कार्यक्रम नवरात्रात केले जातात. नवमीला खंडेनवमी असेही म्हणतात. या दिवशी काही ठिकाणी अवजारांची, शस्त्रांची पूजा करतात.
सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला दिवस म्हणजे घटस्थापना होय. नवरात्राच्या वेगवेगळ्या पूजाविधींमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. यामध्ये वेदिका स्थापना आणि वरूण स्थापना हे महत्त्वाचे भाग आहेत.वेदिका याचा अर्थ शेत असा होतो. या वेदिकेवरच वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते, म्हणूनच घटस्थापनेपूर्वी वेदिका म्हणजे शेत तयार करावे लागते.याच्यासाठी शेतातील किंवा बागेतील माती आणतात.ती पत्रावळीवर किंवा वेताच्या टोपलीत पसरवितात.वेदिकाय नम: या मंत्राने शेताची पूजा करतात.
त्यानंतर त्या शेतात सात प्रकारची धान्ये हळदीच्या पाण्याने भिजवून सप्तधान्यभ्यो नम: असे म्हणत पेरतात. नंतर पर्जन्याय नम: हा मंत्र म्हणत पाणी शिंपडतात. (शक्य असल्यास वैदिक पौराणिक मंत्र म्हणावे.) हे सर्व गुरुजी पूजेच्या वेळी सांगतात. ही वेदी तयार झाल्यावर वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते. हा घट मातीचा, तांब्याचा, चांदीचा वापरता येतो.
पूर्वी सुवर्णाचादेखील घट वापरला जात असे, परंतु सर्वांना सोपा आणि सहजरीत्या मिळावा यासाठी मातीच्या घटाला मान्यता आहे. घटाला कलशदेखील म्हणतात, त्यामुळेच की काय नवरात्र आहे; याला घट बसलेत असे म्हणण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आढळते. नऊ, पाच अशा विषम संख्येत घट घेऊन उतरंडीप्रमाणे त्याची रचना करून म्हणजे एकावर एक घट ठेवून, त्यावर स्वस्तिक काढतात. देवीच्या मूर्तीपुढे ठेवून त्याचे पूजन करतात. काही ठिकाणी कलशात ताम्हण ठेवून त्यात देवीचे टाक ठेवून, त्याची पूजा करतात.
चांदीच्या पत्र्यावरील देवीच्या प्रतिमेला टाक म्हणतात.देवीच्या प्रतिमेवर किंवा घटावर येईल अशाप्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस फुलांच्या जोड माळा वाहतात.यासाठी झेंडूची किंवा तिळाची फुले वापरतात. ही माळ जोडमाळ नवव्यादिवशीपर्यंत तशीच ठेवली जाते. माळ तयार करताना रेशीम लोकर वापरली जाते. रिळाचा किंवा सुताचा दोरा वापरायचा असल्यास दोऱ्याला थोडी तेलहळद लावतात. घटावर देवीची स्थापना केली जाते.काही ठिकाणी घटावर नारळ ठेवून प्रतिष्ठापना करतात.देवीजवळ अखंड दिवा लावतात. हा नवरात्र पुजेतील महत्त्वाचा भाग आहे.
ही तेलवात नऊ दिवस-रात्र तेवत राहावी यासाठी विशेष प्रकारे बनवली जाते. ती जोडवात एक वीत लांब असते.ती कुंकवाने रंगवतात. समईदेखील जाड धातूची वापरतात. दिव्यावर काजळी जमू नये याची काळजी घेतली जाते.
नवरात्रीच्या दिव्याचे तेलदेखील वेगळ्या भांड्यात दिव्याजवळ ठेवले जाते. या अखंड दिव्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्या दिव्याचीदेखील पूजा केली जाते.देवीच्या पूजेसाठी गुरुजी बोलाविण्याची पद्धत आहे.त्यामागील कारण हेच की देवीस्थापना शास्त्र्रोक्त,तंत्रोक्त पद्धतीने व्हावी; परंतु गुरुजी न मिळल्यास देवीची षोडशोपचारे पूजा करावी. विड्याची देठासकट पाने घेऊन हळद-कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा.
पानाचे देठ देवाकडे करावे. देवीचे पाय आपल्याकडे येतील अशी मांडणी करावी. नवरात्राच्या दिवसात देवीचे टाक किंवा मूर्ती जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडून रोज षोडशोपचारे पूजा करावी.
नवरात्रात काही ठिकाणी नऊ दिवस उपवास केला जातो, तर काही ठिकाणी धान्य भाजून स्वयंपाक केला जातो. त्याला धान्य फराळ असं म्हणतात. रोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा-आरती केली जाते. नवमीच्या दिवशी देवीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवितात.आपआपल्या परंपरेप्रमाणे नवमीस नवरात्र समाप्ती करण्याची पद्धत आहे.
समाप्तीच्या दिवशी षोडशोपचारे पूजा करतात. माळ बांधतात. "मात: क्षमस्व' किंवा अंबा क्षमस्व म्हणून देवीवरून ईशान्य दिशेस एक फूल वाहतात. पेरलेल्या वेदिका व घट यांचे अक्षता वाहून विसर्जन करतात.उगवलेल्या धान्याचे अंकुर प्रसाद म्हणून घरात ठेवण्याची पद्धत आहे.