तिथी
|
पौष शुक्ल १४ (७:३१), पौष पौर्णिमा
(७:१५)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
पुनर्वसु (२०:०७)
|
योग
|
विष्कंभ (२१:५५)
|
करण
|
विष्टी (१९:२०)
|
ईशानव्रत
पौष शुक्ल
चतुर्दशीचे व्रत करून पुष्ययुक्त पौर्णिमा असेल तर पांढर्या वस्त्राने
आच्छादलेल्या वेदीवर चारी बाजूंनी अक्षतांचे पुंज ठेवावेत व मध्यावर एक ठेवावा.
त्यावर पूर्वेस विष्णू, पश्चिमेस ब्रह्मा, दक्षिणेस सूर्य व
उत्तरेस रुद्र यांची स्थापना करावी. मध्यावर ईशान स्थापन करून त्याची यथाविधी व
शास्त्रोक्त पूजा करावी आणि एक गौमिथुन (गाय व बैल) दान द्यावे. ब्राह्मणभोजन
घालावे. स्वतः गोमूत्र पिऊन उपवास करावा. याप्रमाणे पाच वर्षे केल्यास हे व्रत
पूर्ण होते. गोदानात एक विशेष हा की, पहिल्या वर्षापासून एक
बैल पण वाढत्या संख्येने दान द्यावीत. बैल गोर्हा ( न जुंपलेला) असावा. या
व्रताने सर्व प्रकारचे सुख मिळून लक्ष्मीची प्राप्ती होते.
विरूपाक्षपूजन
पौष शुक्ल
चतुर्दशीला विरूपक्षाची पूजा करावी व तदनुकूल उपकरण महोक्ष (मोठा बैल किंवा उंट)
याचे दान करावे. याप्रमाणे प्रत्येक शुक्ल चतुर्दशीला वर्षभर करण्याने
राक्षसादींचे भय राहत नाही व घरात सुखशांती नांदते.
शाकंभरी पौर्णिमा
प्राचीन काळी
दुष्काळ पडल्यावर ऋषीमुनींनी देवीची आराधना केली. त्यामुळे पर्जन्यवृष्टी झाली आणि
प्रथम शाक म्हणजे पालेभाज्या उगवल्या. लोकांनी त्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवून
तो प्रसाद म्हणून घेतला आणि दुष्काळ संपला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही हा कुलधर्म
पाळला जातो. शक्य त्या भाज्यांचा नैवेद्य देवीला समर्पण करतात. म्हणून या देवीला
शाकंभरी देवी म्हणतात. पौर्णिमेस या उत्सवाची समाप्ति होते.
अलक्ष्मीनाशक स्नान
पौष पोर्णिमेस हे
अलक्ष्मीनाशक स्नान करतात. या दिवशी पुष्यनक्षत्र असेल तर पुरुषाने पांढर्या
मोहरीचा कल्क अंगाला लावून स्नान करावे व अलक्ष्मी म्हणजे दुर्भाग्याला घरातून
हाकलून द्यावे. नंतर नारायण, इंद्र, चंद्र, बृहस्पती व पुष्य यांच्या
मूर्तींना सर्वोषधियुक्त जलाने स्नान घालून त्यांची पूजा, होम करावा, असे विधान आहे.
माघस्नानारंभ
पौष पौर्णिमा.
माघस्नानासंबंधी प्रारंभ आणि समाप्ती यांविषयी बरेच मतभेद आहेत. ब्रह्मपुराणात, पद्मपुराण यांच्या मते पौष शु. एकादशीला स्नानाला प्रारंभ
करून माघ शु. द्वादशीला किंवा पौर्णिमेला त्याची समाप्ती करावी. तथापी पौषी
पौर्णिमेला प्रारंभ करून माघी पौर्णिमेला याची समाप्ती करण्याचा प्रघात रूढ आहे.
महिनाभर स्नान
करणे शक्य नसेल तर, निदान तीन, दोन किंवा एक
दिवस तरी स्नान करावे.
ऊन पाण्याने
स्नान करण्याने फल निष्फळ ठरते. स्नान शक्यतो थंड पाण्याने करावे. अशक्त, आजारी माणसाने ऊन पाण्याने स्नान करण्यास हरकत नाही, असे शास्त्रवचन आहे. मात्र ज्या जलाशयात स्नानास आरंभ केला, त्याच जलाशयात ते समाप्तीपर्यंत करायला पाहिजे, असा निर्बंध आहे. सूर्योदयानंतर हे स्नान कनिष्ठ आहे. माघ, कार्तिक आणि वैशाख हे महिने पवित्र मानले गेले आहेत. या
महिन्यांत तीर्थक्षेत्रांत अगर स्वतःच्या घरी राहून स्नानदानादी करण्याने महत्फल
प्राप्त होते. स्नान सूर्योदयी उत्तम व पुढे जेवढा वेळ अधिक तेवढे निष्फळ मानले
जाते. स्नानासाठी काशी, प्रयाग उत्तम मानले गेले आहेत. तेथे न जाता
आल्यास त्यांचे स्मरण करून अथवा
'पुष्करादीनि तीर्थानि गंगाद्याः सरितस्तथा ।
आगच्छन्तु
पवित्राणि स्नानकाले सदा मम ॥''
असे म्हणून स्नान
करावे.
'हरिद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते ।
स्नात्वा कनखले
तीर्थे पुनर्जन्म न विद्यते ।'
'अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती
चैव सप्तै ते मोक्षदायिकाः ।'
'गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु
कावेरि जलेस्मिन् सन्निधिं कुरु ॥'
असे म्हणावे अथवा
कोणत्याही वेगाने वाहणार्या प्रवाहात स्नान करावे, किंवा रात्रभर
छतावर ठेवलेल्या घागरीतील पाण्याने स्नान करावे, किंवा दिवसभर
उन्हाने तापलेल्या पाण्याने स्नान करावे. स्नानाच्या आरंभी
' आपत्वमसि देवेश ज्योतिषां पार्तरेव च ।
पापं नाशाय मे
देव वाङ्मनः कर्मभिः कृतम् ॥'
या मंत्राने
पाण्याची व
दुःखदारिद्र्यनाशाय
श्रीविष्णोस्तोषणाय च ।
प्रातःस्नानं
करोम्यद्य माघे पापविनाशनम् ॥ '
या मंत्राने ईश्वराची
प्रार्थना करावी. स्नानानंतर
'सवित्रे प्रसवित्रे च परं धाम जले मम ।
त्वत्तेजसा
परिभ्रष्टं पापं यातु सहस्त्रधा ॥'
या मंत्राने
सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावेत व प्रभूचे स्मरण आणि पूजन करावे. माघस्नानासाठी
ब्रह्मचारी, गृहस्थ, संन्यासी आणि
वनवासी चारी आश्रमांतील, तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आदी, तसेच बाल, युवा, वृद्ध या तीन्ही अवस्थांतले, आणि स्त्री, पुरूष वा नपुंसक या सर्वांना आज्ञा आहे. स्नानाची व्याप्ती
एकतर पौष शु. ११ ते माघ शु. ११ अगर पौष शु. १५ ते माघ शु. १५ पर्यंत आहे, अथवा सूर्य मकर राशीला आल्यापासून ते कर्केला जाईपर्यंत
नित्य स्नान करावे व त्यानंतर यथावकाश मौन पाळावे. परमेश्वराचे भजन-पूजन करावे.
ब्राह्मणांना यथाशक्ती नित्य भोजन, कांबळे, हरणाचे कातडे, कपडे, चादर, रुमाल, सदरा, टोपी, पादत्राणे, पगडी, रत्न आदी दान द्यावे. एक किंवा एकतीस दंपतींस
मिष्टान्न-भोजन घालून
सूर्यो मे
प्रीयतां देवो विष्णुमूर्ति निरंजनः ।'
या मंत्राने
सुर्याची प्रार्थना करावी व त्यांना सप्तधान्ये व ३० मोदक द्यावेत. स्वतः निराहार, शाकाहार, फलाहार किंवा दुग्धाहार
व्रत किंवा एकभुक्त करावे. याप्रंमाणे षड्रिपूंचा त्याग करून भक्ती, श्रद्धा, विनय, नम्रता, स्वार्थत्याग आणि विश्वासभाव
ठेवून व्रत करावे. याचे फल अश्वमेधयज्ञफलासमान आहे. सर्व प्रकारची दुःखे दूर होतात.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
भद्रा
७:३१ नंतर १९:२० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
क्षयदिन
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
अन्नपूर्णा प्रगट दिन !!!
ReplyDelete---------------------
पौष शुद्ध पौर्णिमा, अर्थात शाखम्बरी पौर्णिमा,ह्याच दिवशी"अन्नपूर्णा माता"प्रगटली.मूळ पार्वती मातेचाच ह्या प्रगट अवतारच कार्य म्हणजे या वसुंधरा नामक पृथ्वीला सुजलाम सुफलाम बनवण.प्रत्येक जीवात्म्याला जगण्यासाठी मुबलक प्रमाणात अन्नसंवर्धन करणं."अन्नम ब्रम्हेति व्यज्नात" किवा"अन्न हे पूर्ण ब्रम्ह" हे तत्त्व अंगीकारून, अन्न ग्रहण करताना मानव,कृतार्थ भावाने परमात्म्याचे स्मरण करतो.त्या मानवाच्या मस्तकावर,अन्नपूर्णा माता नेहमी आपला वरद हस्त ठेवते.इतकच नव्हे तर जो मानव निस्वार्थी मनाने अन्नदान करतो,त्याला धन धान्याची कधीच कमतरता पडू देत नाही,अश्या वत्सल,प्रेमळ मातेचे मानवाने निरंतर स्मरण ठेवून.सदैव कृतज्ञ रहाव.��