ऋषिपंचमी
भाद्रपद शुक्ल
पंचमी दिवशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदी सर्व
स्त्रियांनी नदीवर स्नान करून आपल्या घरातील पवित्र जागी ( देवघरात ) हळदीचे
चौकोनी मंडळ करावे व त्यावर सप्तर्षींची स्थापना करून गंध, फुले, धूप,
दीप, नैवेद्य अर्पण करावा व
'कश्यपोऽत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतम:
।
जमदग्निवंसिष्ठश्च
सप्तैते ऋषय: स्मृता: ।
गृहीत्वार्घ्यं
मया दत्तं तुष्टा भवन्तु सर्वदा ।'
असे म्हणून
अर्घ्य द्यावा. यानंतर न नांगरलेल्या जमिनीवरील उत्पन्न झालेले शाकादी पदार्थ खाऊन
व्रत करावे. याप्रमाणे सात वर्षे करून आठव्या वर्षी सप्तर्षीच्या सोन्याच्या
मूर्ती करून त्या कलशावर स्थापन कराव्या व त्यांची पूजा करावी. सात गोदाने आणि सात
दांपत्यांना भोजन घालून मूर्ती विसजन कराव्यात. काही ठिकाणी स्त्रिया पंचताडी
नावाचे तृण व भावाने दिलेले तांदूळ यांचे कावळें वगैरेंना बली देऊन, मग स्वत: जेवतात.
स्त्रियांच्या
मासिक पाळीतील संपर्क दोष नाहीसे होण्यासाठी स्त्रियांनी व पुरुषांनीही हे व्रत
अवश्य करावे.
कहाणी ऋषिपंचमीची
ऐका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता. तो
आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशीं काय झालं ? त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरांत कालविला.
त्या दोषानं काय झालं ? तिचा नवरा पुढच्या जन्मीं बैल झाला. त्या बाईला
आपला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी ! दोघंहि आपल्या मुलांच्या घरीं होतीं. तो
मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशीं त्याच्या घरी
श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं. आज माझ्या आईचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा सैंपाक कर
! ती मोठी पतिव्रता होती. तिनं चार भाज्या केल्या. चार कोशिंबीरी केल्या, खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यांत काय चमत्कार झाला ? खिरीचं भांडं उघडं होतं त्यांत सर्पान आपलं गरळ टाकलं. हें
त्या कुत्रीनं पाहिलं, मनांत विचार केला. ब्राह्मण खीर खातील नि मरून
जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली. पटकन् खिरीच्या पातेल्याला
शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या
कंबरेंत मारलं. तो सैंपाक टाकून दिला. पुन्हां सैंपाक केला. ब्राह्मणांना जेवू
घातलं. कुत्रीला उष्टंमाष्टं देखील घातलं नहीं. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली.
तेव्हां ती आपल्या नवर्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडूं
लागली. बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज
मला अन्न नाहीं, पाणी नाहीं. खिरीच्या पातेल्यांत सर्पान गरळ
टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवलें.
माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग
दुखतं आहे. ह्याला मी काय करूं ? बैलानं तिला उत्तर दिलं, तूं आदल्या जन्मीं विटाळशीचा विटाळ घरांत कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालों. मीदेखील
आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हें भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठून
बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं
पाणी प्यायला दिलं. मनांत दुखी झाला.
दुसरे दिवशी
सकाळीं उठला. घोर अरण्यांत गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग
नमस्कार घातला. ऋषींनीं त्याला प्रश्न केला, तूं असा
चिंताक्रांत कां आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला
बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेंत मी पडलों आहे. कृपा करून मला उपाय सांगा.
तेव्हां त्याला ऋषींनीं सांगितलं, तूं ऋषिपंचमीचं व्रत कर !
तें व्रत कसं करावं ? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या
पाखांतली पंचमी येते. त्या दिवशीं काय करावं ? ऐन दुपारच्या
वेळीं नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतघावन करावं.
आंवळकाठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. तें तेल केंसाला लावावं, मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्रें नेसांवीं. चांगल्या
ठिकाणीं जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्ष
करावं. शेवटीं उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं ? रजस्वला दोष
नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थांच्या स्नानांचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या
दानांचं पुण्य लागतं, मनीं इच्छिलं कार्य होतं. मुलानं तें व्रत
केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिलं. त्या पुण्यानं काय झालं ? रजोदोष नाहींसा झाला. आकाशांतून विमान उतरलं. बैल होता तो
सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानांत बसून स्वर्गास
गेलीं. मुलाचा हेतु पूर्ण झाला, तसा तुमचा-आमचा होवो. ही
साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण
No comments:
Post a Comment